महाराष्ट्र

MSRTC : वर्धाच्या रस्त्यांवर धावणार डिजिटल स्वप्नांची एसटी

Wardha : नव्या युगातील लालपरी; आता प्रवासाला स्पीडसह स्मार्टनेस

Author

वर्धा जिल्ह्याच्या रस्त्यांवर आता धावणार आहे टेक्नोयुगातील नवसंजीवनी. डिजिटल सुविधांनी सजलेली अत्याधुनिक एसटी बससेवा. प्रवाशांच्या अनुभवात क्रांती घडवत, ही नवी लाल परी आता स्मार्ट प्रवासाची नवी ओळख बनणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाचा चेहरामोहरा आता संपूर्णपणे बदलतो आहे. 15 वर्षांनंतर प्रथमच महाराष्ट्रात आधुनिकतेचा शिडकावा घेत, डिजिटल तंत्रज्ञानाने सजलेल्या नव्या एसटी बसगाड्या रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. या ऐतिहासिक नवकल्पनेत वर्धा जिल्ह्याने आपला ठसा उमठवला आहे, कारण वर्ध्याला एकाच वेळी तब्बल 20 नव्या डिजीटल बसेस मिळाल्या आहेत.

वर्धा, आर्वी, हिंगणघाट आणि तळेगाव येथील आगारांना प्रत्येकी पाच बसेस देण्यात आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत होणार आहे. या नव्या बसगाड्या म्हणजे केवळ वाहतूक साधन नाहीत, तर त्या एक डिजिटल अनुभव आहेत. पारंपरिक एसटी प्रवासाच्या तुलनेत या नवीन बस अनेक अत्याधुनिक सुविधा घेऊन येत आहेत.

वेळेवर देखभाल आणि दुरुस्ती

या नव्या बसगाड्यांमध्ये प्रवाशांसाठी अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक बसमध्ये 3 बाय 2 अशी आरामदायक आसन व्यवस्था असून प्रवास अधिक सुखद व आरामशीर होतो. चालकांसाठी डिजिटल डॅशबोर्ड आणि एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामुळे बसच्या कामकाजावर बारकाईने नजर ठेवता येते. इंजिनमध्ये बसवण्यात आलेले स्मार्ट सेन्सर्स बिघाडाची त्वरित माहिती देतात, तर संगणकीकृत बिघाड निदान प्रणाली वेळेवर देखभाल आणि दुरुस्ती शक्य करते.

Nagpur : आरोग्याच्या रणांगणात मोटाभाईंची सर्जिकल स्ट्राईक

प्रवाशांसाठी प्रवासी माहिती फलक, एलईडी टीव्हीवर माहिती व जाहिराती, आणि संगीताचा अनुभव देण्यात आला असून, बसमध्ये बसताच प्रवासाच्या ठिकाणांची माहिती, जाहिराती आणि करमणुकीचा आनंद मिळतो. हे सर्व अनुभव एखाद्या स्मार्ट मोबाईल अ‍ॅप्लिकेशनसारखे, पण प्रत्यक्ष प्रवासात मिळतात.  त्यामुळे ही बसगाडी केवळ वाहतुकीचं साधन न राहता, डिजिटल युगातील एक प्रवासी अनुभव बनते.

जलद सेवा

पूर्वी महामंडळ जुन्या चेसिसवर बसची बांधणी करत असे. मात्र आता संपूर्ण तयार बस थेट कंपन्यांकडून खरेदी करण्यात येत आहेत. यामुळे बसचा दर्जा, उपलब्धतेचा वेग आणि सर्व भागांची एकसंधता यावर भर देण्यात आला आहे. परिणामी, बस सेवा अधिक विश्वासार्ह व प्रवाशांच्या गरजा ओळखून साकारलेली ठरते.

नव्या बसमध्ये बसवलेले स्मार्ट सेन्सर्स आणि डिजिटल यंत्रणा बसमधील बिघाडाची माहिती थेट संगणक प्रणालीपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे वेळेवर तांत्रिक त्रुटींचं निदान होऊन प्रवास विलंब न होता सुरू राहतो. प्रवाशांचा वेळ वाचतो, आणि प्रवास अधिक सुलभ होतो. वर्धा जिल्ह्याच्या दृष्टीने ही बसगाड्या केवळ सोयी नसून, एक उन्नतीचा टप्पा आहेत. डिजिटल तंत्रज्ञान आणि प्रवाशांची काळजी यांचा मिलाफ असलेली ही बससेवा ग्रामीण भागापासून शहराच्या अंतरापर्यंतच्या दैनंदिन प्रवासाला नवसंजीवनी देणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!