
छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते, तर भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक होते. त्यांच्या नेतृत्वाने राष्ट्राच्या इतिहासाला नवा आयाम दिला, असे मोहन भागवत यांनी गौरवोद्गार काढले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना भारताच्या इतिहासातील युगपुरुष म्हणून संबोधले. नागपुरात आयोजित एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणांचे चक्र मोडून काढल्याचे सांगितले. भारत शतकानुशतके पराभवाच्या परंपरेशी लढत होता, मात्र शिवरायांच्या प्रभावी नेतृत्वामुळे या परंपरेला पूर्णविराम मिळाला, असे भागवत म्हणाले.
भागवत यांनी ऐतिहासिक संदर्भ देत स्पष्ट केले की, अलेक्झांडर द ग्रेटपासून इस्लामी आक्रमणांपर्यंत भारताच्या व्यवस्थांना सातत्याने मोठे धोके निर्माण होत राहिले. राजस्थानातील राजे आणि विजयनगर साम्राज्य देखील या आव्हानांवर कायमस्वरूपी उपाय शोधू शकले नाहीत. मात्र, सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी या आव्हानांवर मात करून मराठा साम्राज्याची स्थापना केली.

प्रेरणेचा अखंड स्रोत
मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा आजही प्रासंगिक आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही त्यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्ट दिसून आला. रवींद्रनाथ टागोर आणि स्वामी विवेकानंद यांसारख्या विभूतींनी शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेतली होती.
शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आपल्या गडांचा पुन्हा ताबा मिळवला. यामुळे त्यांनी परकीय आक्रमकांच्या विरोधातील निर्णायक विजय मिळवला. त्यांच्या राज्याभिषेकाने भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला नवा वेग दिला, असे भागवत म्हणाले.
देशभरात शिवरायांचा प्रभाव
भागवत यांनी ऐतिहासिक संदर्भ देत सांगितले की, छत्रसाल बुंदेला, दुर्गादास राठोड आणि ईशान्य भारतातील चक्र ध्वज सिंह यांनी शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून मुघलांविरुद्ध संघर्ष केला. चक्र ध्वज सिंह यांनी आपल्या पत्रांमध्ये शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले होते आणि बंगालच्या उपसागरातील आक्रमकांना नेस्तनाबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला होता.
भागवत यांनी नमूद केले की, शिवाजी महाराज आजच्या काळातही आदर्श आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि पुढील पिढ्यांनी शिवरायांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प केला. संघाच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज हे आधुनिक युगातील महानायक आहेत, असे भागवत म्हणाले.