महाराष्ट्र

Nagpur : बनावट कागदपत्र, अनुभवही खोटा, मुख्याध्यापकाने मात्र खऱ्या घेतल्या नोटा 

Ulhas Narad : पोलिसांनी शिक्षण उपसंचालकाला उचलले गडचिरोलीतून

Author

नागपूर विभागातील शिक्षण व्यवस्थेत भूकंप घडवणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला आहे. उपसंचालक उल्हास नरड यांना अटक, तर मुख्याध्यापक पराग पुडकेसह तिघे जेरबंद करण्यात आले आहेत.

नागपूर विभागातील शिक्षण व्यवस्थेत मोठा खळबळजनक घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट शालार्थ आयडी प्रकरणामुळे शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आधी वेतन पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर 11 एप्रिल रोजी उशिरा रात्री नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोली येथून अटक करण्यात आली. त्यांच्यावर बनावट दस्तऐवजांच्या आधारे एका व्यक्तीस मुख्याध्यापक पदाची मंजुरी देण्याचा गंभीर आरोप आहे. या कारवाईनंतर मध्यरात्री त्यांना नागपूरला आणण्यात आले. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला पराग नानाजी पुडके, रा. जेवताळा, ता. लाखनी, जि. भंडारा यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, 2019 पासून जिल्ह्यातील सुमारे 580 प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासकीय मान्यता नसतानाही वैयक्तिक मंजुरी देण्यात आली होती. या प्रक्रियेमध्ये शालार्थ आयडीही बनावट पद्धतीने निर्माण करण्यात आले. या सर्व प्रक्रिया कोणतीही शहानिशा न करता, नियमबाह्य आणि बेकायदेशीर मार्गाने करण्यात आल्या. परिणामी, अशा अपात्र कर्मचाऱ्यांना शासनाच्या निधीतून वेतन देण्यात आले. शासनाने केलेल्या चौकशीत या प्रकरणात वेतन पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे यांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले.

कथित व्यवहार

घोटाळ्यात मुख्य आरोपी असलेला पराग नानाजी पुडके याने शिक्षक म्हणून कोणताही अनुभव नसताना, नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यालय यादवनगर या शाळेचे बनावट कागदपत्र तयार करून खोटा अनुभव दर्शवला. या कागदपत्रांच्या आधारेच उपसंचालक उल्हास नरड यांनी कथित आर्थिक व्यवहार करून त्याला भंडारा जिल्ह्यातील जेवताळा येथील नानाजी पुडके विद्यालयात मुख्याध्यापकपदी मंजुरी दिली. हा सर्व प्रकार शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी याबाबत सखोल तपास सुरू केला आहे.

Chandrashekhar Bawankule : विकासाच्या गतीत ‘पाणी’च राहिलं मागे 

घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील इतर अधिकारी, वेतन पथकातील कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे संकेत पोलिस सूत्रांनी दिले आहेत. भविष्यात आणखी अटकसत्र राबविले जाण्याची शक्यता आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्ह्यातील आणि राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक व मुख्याध्यापक नियुक्त्या कशा केल्या गेल्या आणि त्यामागे कोणाचे हात होते, याचा वेध घेण्यास शासन सज्ज झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ही घटना शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेवर आणि शासकीय प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!