
भाजपने सहा मंडळ अध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. मुंबईतून कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नावे घोषित केली.
भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संघटनात्मक निर्णय घेण्यात आला आहे. भाजपने अमरावती शहरातील सहा मंडळ अध्यक्षांची नावे अधिकृतपणे जाहीर केली असून मुंबई प्रदेश कार्यालयातून कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे. या घोषणेमुळे शहर भाजपमध्ये नव्या नेतृत्वाला चालना मिळणार असल्याचे स्पष्ट दिसते.
मुंबईत रविवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या नावांची अंतिम रूपाने घोषणा करण्यात आली. भाजपच्या संघटन पर्व अभियानांतर्गत स्थानिक पातळीवर झालेल्या बैठका आणि अभ्यासानंतर मुंबई कार्यालयाने ही निवड प्रक्रिया अंतिम केली.

Nana Patole : शिक्षक भरती घोटाळ्यात एसआयटी नाही न्यायालयीन चौकशी हवी
नव्या चेहऱ्यांना संधी
संत गाडगेबाबा मंडळासाठी अभिजित वानखडे यांची, कॉटन मार्केटसाठी सचिन नाईक, विद्यापीठ मंडळासाठी प्रफुल बोके, स्वामी विवेकानंद मंडळासाठी संतोष कावरे, अंबा मंडळासाठी मनीष चौब तर साई मंडळाच्या अध्यक्षपदी भारती गुहे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांची निवड कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी असून संघटनात्मक दृष्टिकोनातून ही नेमणूक शिस्तबद्धतेचे प्रतिक आहे.
शहर भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संघटनात्मक घडामोडी वेग घेत आहेत. नवीन चेहऱ्यांना संधी देत भाजपने पुढील निवडणुकीसाठी संघटना बळकट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रत्येक मंडळात सक्रिय व लोकप्रिय कार्यकर्त्यांना नेतृत्वाची जबाबदारी देऊन पक्षाने कार्यकुशलतेवर भर दिला आहे. विशेष म्हणजे या सर्व नेमणुका स्थानिक फीडबॅकवर आधारित असून केवळ वरिष्ठ नेत्यांच्या इच्छेनुसार नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर करत घेतलेले निर्णय आहेत.
नवी सुरुवात
निर्णय प्रक्रियेत बडनेरा मंडळाच्या अध्यक्षपदाचा निर्णय मात्र अद्याप जाहीर झालेला नाही. यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात विविध चर्चांना ऊत आला असून संभाव्य नावांची नावे स्थानिक पातळीवर चर्चिली जात आहेत. बडनेरा हे महत्त्वाचे मंडळ असल्यामुळे येथे योग्य व्यक्तीच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षाकडून अत्यंत बारकाईने विचार सुरू असल्याचं बोललं जात आहे.
सर्व नवनियुक्त अध्यक्षांचे अमरावती भाजप शहर जिल्हा व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून जाहीर अभिनंदन करण्यात आले असून पुढील काळात या नेतृत्वाखालील मंडळ कार्यकर्त्यांमध्ये संघटनात्मक ऊर्जा आणि सामूहिक सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही घोषणा म्हणजे भाजपच्या नव्या पर्वाची सुरुवात असून अमरावतीतील पक्षाची रचना अधिक गतिमान होण्याची स्पष्ट चिन्ह दिसून येत आहेत.