
जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र भाजपकडून सर्वत्र गौरव करण्यात येत आहे.
नवभारताच्या विकासाचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय मंजूर केला. हा देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समतेच्या दिशेने टाकलेलं ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल ठरत आहे. भारतीय लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी हा एक अत्यंत मोलाचा टप्पा मानला जात आहे. यामुळे सर्व समाजघटकांचा विकास अधिक न्याय्य पद्धतीने साधता येणार आहे, असे महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बावनकुळे यांनी या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाने पंतप्रधान मोदी यांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे जोरदार स्वागत करत, महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने एक अभिनंदन ठराव घेण्याची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, या क्रांतिकारी निर्णयाचा गौरव करण्यासाठी राज्यातील एक लाख 186 बूथ, एक हजार 280 मंडळ समित्या आणि 27 हजार ग्रामपंचायतींमध्ये पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करण्याचे ठरवण्यात आले आहे.
अनेकांची चुप्पी
जातनिहाय जनगणना केवळ आकडेवारी गोळा करण्याचं माध्यम नाही. ती देशातील प्रत्येक घटकाचा सहभाग आणि त्यांच्या गरजांनुसार रचना उभारण्याचं प्रभावी साधन आहे. त्यामुळेच या निर्णयामुळे देशात नव्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक बदलांची दारे उघडणार आहेत. बावनकुळे म्हणाले, ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी करत आंदोलनं केली, त्या शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांचं आता काय? त्यांनी इतके दिवस जी जनगणनेची मागणी केली, त्यावर मोदी सरकारने निर्णायक पाऊल टाकल्यावर हे नेते आता गप्प का बसलेत? असा सवाल जनतेतून विचारण्यात येत असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांचा हा निर्णय केवळ सत्ताधाऱ्यांचा नव्हे, तर संपूर्ण भारत देशातील वंचित, उपेक्षित आणि मागास घटकांच्या उन्नतीचा नवा अध्याय ठरणार आहे. हे पाऊल ‘विकसित भारत’ या दृष्टिकोनाला बळकटी देत आहे. लोकशाही अधिक व्यापक आणि समावेशक करण्याच्या दिशेने एक मोठी झेप ठरते आहे. या ऐतिहासिक निर्णयाच्या निमित्ताने, राज्यभरात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जनजागृती करत असून, मोदींच्या या निर्णयासाठी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.