
भारत आता शिक्षणाच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. जागतिक दर्जाची विद्यापीठे आता देशातच उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबईत उभारण्यात येणारी एज्यु-सिटी आणि परदेशी विद्यापीठांशी झालेले सामंजस्य महाराष्ट्राला ग्लोबल एज्युकेशन हब बनवण्याच्या दिशेने मोठं पाऊल आहे.
भारतातील शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठताना, महाराष्ट्राने ‘ग्लोबल एज्युकेशन हब’ होण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. नव्या शैक्षणिक नीतीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशी विद्यापीठांसाठी भारताचे दरवाजे खुले केले आहेत. त्याचा पहिला सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात दिसून येतो आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेव्हज समिट 2025 मध्ये भव्य घोषणा करत मुंबईत शैक्षणिक आणि औद्योगिक क्रांतीचा नवा अध्याय सुरू केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईत वेव्हज समिट आयोजित करण्यात आल्याचा मला आनंद आहे. जगभरातील गुंतवणूकदार, शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती आणि धोरणकर्ते एकाच व्यासपीठावर आले आहेत. यावेळी जे महत्त्वाचे सामंजस्य करार झाले आहेत, ते महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि औद्योगिक भविष्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत. या समिटमध्ये ‘वेव्हज इंडेक्स’ या नव्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. हे इंडेक्स गुंतवणुकीसाठी एक नफा मिळवणारे मार्गदर्शक ठरेल आणि संपूर्ण परिसंस्थेला नवे बळ देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जागतिक भागीदारी
सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे सिडकोच्या माध्यमातून मुंबईत उभारण्यात येणारी ‘एज्यु-सिटी’. या शैक्षणिक शहरात 10 ते 12 नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठे भागीदारीने येणार आहेत. विद्यार्थ्यांना भारतातच जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल. यामध्ये ऑस्ट्रेलियाची युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि युकेमधील युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क यांचा समावेश आहे. ही दोन्ही विद्यापीठे त्यांच्या देशांतील टॉप चार युनिव्हर्सिटीजमध्ये गणली जातात.
मुख्यमंत्री म्हणाले, आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागते. त्यांना मोठ्या खर्चाचा आणि कौटुंबिक दडपणाचा सामना करावा लागतो. परंतु आता, हेच जागतिक दर्जाचे शिक्षण आपण आपल्या देशात देणार आहोत. जे केवळ शिक्षणच नव्हे तर कौशल्यविकास आणि रोजगाराच्या नव्या संधी तयार करेल.
वेव्हज समिटमध्ये फक्त शिक्षणच नव्हे, तर उद्योगक्षेत्रातही महत्त्वाचे निर्णय जाहीर झाले. गोदरेज समूह आता पनवेलमध्ये सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्चून एक आधुनिक फिल्म सिटी उभारणार आहे. यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. फडणवीस म्हणाले, आज झालेली एकूण आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही, तर तिचा गुणक परिणाम भविष्यात संपूर्ण राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले की, आज महाराष्ट्राने केवळ गुंतवणूक मिळवली नाही, तर भविष्यासाठी विश्वासार्हता, गुणवत्ता आणि जागतिक सहभाग यांचा पाया रचला आहे. ही गुंतवणूक आणि हे उपक्रम महाराष्ट्राला केवळ देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य बनवतील.
सर्वांगीण प्रगती
मुंबईत उभारण्यात येणारी एज्यु-सिटी, परदेशी विद्यापीठांसोबतचे करार, वेव्हज इंडेक्स आणि फिल्म सिटी हे सर्व एकत्र येऊन महाराष्ट्राला एक सर्वांगीण प्रगतीच्या मार्गावर घेऊन जात आहेत. शिक्षण आणि उद्योगाच्या संगमातून तयार होणारी ही नवी दिशा, राज्यातील तरुणांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याचे सामर्थ्य बाळगते. शिक्षणाच्या नव्या अध्यायाची सुरुवात मुंबईत झाली आहेत. हा अध्याय महाराष्ट्राला ज्ञान, कौशल्य आणि रोजगाराचे नवीन युग दाखवेल. या सर्व प्रकल्पांचे दूरगामी परिणाम केवळ मुंबईपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील विद्यार्थ्यांसाठी नवीन संधींचे दार खुले करतील.