
आता युद्ध केवळ जमिनीवर नाही, तर आकाशातूनही लढले जात आहे. इस्रोच्या अत्याधुनिक उपग्रहांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक नजर ठेवत भारताच्या संरक्षणात निर्णायक भूमिका बजावली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) उपग्रह आता केवळ विज्ञानाच्या मर्यादित कक्षा ओलांडून थेट देशाच्या सीमांच्या रक्षणात निर्णायक भूमिका बजावत आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादी तळ, लष्करी हालचाली आणि गुप्त रडार स्टेशन यांचा शोध घेण्यात आणि त्यावर अचूक हल्ला करण्यात भारतीय सैन्याला मिळालेल्या यशामागे इस्रोच्या अत्याधुनिक उपग्रहांची ताकद आहे.
भारतीय सशस्त्र दलांनी अलीकडील काळात पाकिस्तानातील दहशतवादी गटांवर आणि लष्करी यंत्रणेवर केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्यांमध्ये ISRO उपग्रहांनी मिळवून दिलेली माहिती अत्यंत निर्णायक ठरली. हे उपग्रह सीमापार असलेल्या लष्करी तळांवरील हलचाली, दहशतवादी अड्डे, शस्त्रास्त्रांची हालचाल, ड्रोन तैनाती, आणि इलेक्ट्रॉनिक संवाद यावर सतत लक्ष ठेवून आहेत.

डोळस देखरेखीचे जाळे
भारतीय सैन्याला दुश्मनांच्या हालचाली अचूकपणे ओळखण्यासाठी, हल्ल्याचे लक्ष्य ठरवण्यासाठी, आणि पाकिस्तानच्या लष्करी तळांवरील रडार, शस्त्रसाठे आणि कम्युनिकेशन यंत्रणेची माहिती गोळा करण्यासाठी इस्रोचे 7 प्रमुख उपग्रह अविरत कार्यरत आहेत. हे उपग्रह केवळ प्रतिमा नव्हे तर थर्मल, रडार आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नलच्या आधारे गोपनीय माहिती संकलित करतात. या उपग्रहांच्या साहाय्याने सीमाभागात ‘रिअल टाइम’ प्रतिमा आणि व्हिडिओ मिळतात. ज्यामुळे कारवाईत अचूकता आणि गती वाढते.
ISRO कार्टोसॅट सिरीज उपग्रह 0.35 मीटर पर्यंत उच्च रिझोल्यूशन प्रतिमा देऊ शकतात. ज्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवादी लाँच पॅड आणि लष्करी ठिकाणांचे स्पष्ट फोटो भारतीय संरक्षण यंत्रणेला मिळतात. या प्रतिमांमुळे हलचाली, शस्त्रास्त्रांची तैनाती आणि संरचनात्मक बदल यावर सतत लक्ष ठेवता येते.
अचूक प्रतिमा
पहिले म्हणजे RISAT-2B हे सिंथेटिक एपर्चर रडारवर आधारित असल्याने ढगाळ वातावरण, रात्र आणि धूळ यांमध्येही स्पष्ट निरीक्षण करते. समुद्रात शिरकाव करणाऱ्या संशयास्पद जहाजांवर नजर ठेवते. दुसरे उपग्रह RISAT-2BR1 हे अवघ्या 35 सेंटीमीटर अंतरावर असलेल्या दोन वस्तू सहज ओळखतो. पाकिस्तानच्या लपवलेल्या हालचाली उघडकीस आणण्यात महत्त्वाचा. तिसरे Cartosat-3 उपग्रह हे थर्मल इमेजिंग आणि पंचक्रोमॅटिक कॅमेरा यामुळे 25 सेंटीमीटर पर्यंतच्या वस्तूंच्या प्रतिमा मिळतात. दहशतवादी लपण्याची ठिकाणे अचूक टिपता येतात.
चौथे उपग्रह EMISAT: DRDO ‘कौटिल्य’ प्रकल्पातून विकसित 90 मिनिटांत पृथ्वीच्या एका परिघाची फेरी मारतो. पाकिस्तानच्या रडार स्टेशनचे इलेक्ट्रॉनिक सिग्नल पकडतो. पाचवे उपग्रह म्हणजे, HySIS हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग तंत्रज्ञान वापरतो. लष्करी वाहने, शस्त्रास्त्रे त्यातील धातू किंवा साहित्याच्या आधारे ओळखतो. सहावे GSAT-7 उपग्रह हे नौदलाच्या वापरासाठी 60 जहाजे आणि 75 विमाने एकत्र जोडतो. समुद्रातील वस्तूंचा रिअल-टाइम मागोवा घेण्याची क्षमता. सातवे उपग्रह GSAT-7A (Angry Bird) हवाई दलासाठी. ड्रोन, लढाऊ विमाने आणि नियंत्रण यंत्रणा एकमेकांशी जोडतो. नेटवर्क-केंद्रित युद्धशक्ती वाढवतो.
नव्या उपग्रहांचे प्रक्षेपण
भारतीय अंतराळ कार्यक्रम आता याठिकाणीच थांबणार नाही. इस्रोने पुढील पाच वर्षांत 52 नव्या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. या उपग्रहांपैकी अर्धे खासगी क्षेत्राद्वारे विकसित होतील आणि उर्वरित इस्रो स्वतः विकसित करेल. हे उपग्रह केवळ गुप्तचरच नव्हे, तर सीमा सुरक्षेपासून ते सायबर युद्ध आणि सागरी देखरेख पर्यंत विविध कार्यांसाठी वापरले जातील.
इस्रोचे हे उपग्रह आता केवळ विज्ञानाचे उपकरण राहिले नाहीत, तर ते भारताच्या सीमांचे सावध आणि सजग रक्षक ठरले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज हे उपग्रह भारताला माहितीच्या युद्धात अजय बनवत आहेत. पाकिस्तानसारख्या शत्रुराष्ट्रांच्या प्रत्येक हालचालीवर अंतराळातून नजर ठेवण्याची ताकद आज भारताकडे आहे. हीच ताकद देशाच्या संरक्षणात निर्णायक ठरते आहे.