महाराष्ट्र

Operation Sindoor : भारताच्या ठिणग्यांनी पाकची बुद्धी ठिकाणावर

India Pakistan War : शस्त्रसंधीच्या आधी होते अणु तंबूवर लक्ष्य

Post View : 19

Author

सीमेवर रणसंग्रामाचा थरार सुरू असतानाच भारताने ब्रह्मोसचा इशारा देत पाकिस्तानच्या अणुप्रकल्पांनाच लक्ष्य केलं. दबावाखाली पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली, पण काही तासांतच विश्वासघात करत ती फोडली.

दोन अण्वस्त्रधारी शेजारी देश पुन्हा एकदा संघर्षाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले होते. मागील चार दिवसांपासून वाढत चाललेला भारत-पाकिस्तान तणाव 10 मे रोजी एका निर्णायक वळणावर आला, जेव्हा संध्याकाळच्या सुमारास दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली. मात्र, या घोषणेनंतर काही तासांतच पाकिस्तानने पुन्हा एकदा विश्वासघात करत त्याचा भंग केला आणि आपली नेहमीची दुटप्पी भूमिका अधोरेखित केली.

सूत्रांनुसार, 10 मेच्या सकाळी भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या अत्यंत संवेदनशील आणि रणनीतिक महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर निशाणा साधत ब्रह्मोस-ए क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला. हे हल्ले रावळपिंडीजवळील चकलाल, पंजाबमधील सरगोधा, जैकोबाबाद, भोलारी आणि स्कार्दू या ठिकाणी करण्यात आले. या ठिकाणांवर पाकिस्तानचे दारूगोळा साठवण केंद्रे, लष्करी विमानतळ आणि कमांड पोस्ट्स होत्या.

पाकिस्तान गोंधळला

या कारवाईनंतर लगेचच भारतीय गुप्तचर संस्थांना पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेतून प्रचंड हालचाली आणि सावधगिरीच्या सूचना टिपता आल्या. त्यात भारताने पुढील टप्प्यात पाकिस्तानच्या आण्विक नियंत्रण पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकतो, असे संकेत मिळाले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आपल्या महत्त्वाच्या धोरणात्मक ठिकाणांभोवती सुरक्षा वाढवली.

दबावामुळे पाकिस्तानने तत्काळ अमेरिकेकडे मध्यस्थीची मागणी केली. आधीच दोन्ही देशांमधील वाढत्या तणावावर नजर ठेवणाऱ्या अमेरिकेने भारताच्या थेट कारवाईनंतर अधिक सक्रिय भूमिका घेतली. वॉशिंग्टनने इस्लामाबादला स्पष्ट शब्दांत सांगितले, “विलंब न करता तणाव कमी करा आणि थेट लष्करी हॉटलाइनचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणा.

प्रत्यक्ष संपर्क 

दुपारी भारताने पाकिस्तानकडून येणारे अनेक हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. त्यानंतर पाकिस्तानचे डीजीएमओ मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला यांनी भारतीय समकक्ष लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्याशी सायंकाळी संपर्क साधला. हा कॉल म्हणजे पाकिस्तानकडून झालेली शरणागती मानली जात आहे. याची पुष्टी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पत्रकार परिषदेत केली.

भारताने या संपूर्ण कालावधीत कुठल्याही प्रकारच्या औपचारिक राजनैतिक अथवा लष्करी चर्चांमध्ये सहभागी होण्याचे टाळले. प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन पाकिस्तानशी थेट संवाद साधण्यास भारताने नकार दिला. परिणामी, दिल्लीने जागतिक दबाव झुगारत आपली स्वायत्त भूमिका प्रस्थापित केली आणि भारतीय सशस्त्र दल सज्ज असल्याचे संकेत दिले.

अधिक आक्रमक

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने निर्णायक धोरणात्मक बदल करत सिंधू जल करार तात्पुरता स्थगित केला होता. युद्धबंदीचा या निर्णयावर परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याचा अर्थ भारताकडून पाकिस्तानवर सुरू असलेला ‘वॉटर स्ट्राइक’ कायम राहणार आहे.

जरी शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली असली तरी त्यानंतर काही तासांतच पाकिस्तानकडून गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाले. यावर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत पाकिस्तानच्या या विश्वासघातकी कृतीवर संताप व्यक्त केला. भारताने यानंतर आपल्या सैन्याला आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी जाहीर केले.

ही संपूर्ण घटनाक्रम पुन्हा एकदा दाखवून देते की पाकिस्तानला शांतता नको, तर संधीचा लाभ घ्यायचा असतो. मात्र भारत आता अधिक दृढ, निर्णायक आणि आंतरराष्ट्रीय दबावाला न झुकणारी भूमिका घेत आहे. भारताची यशस्वी रणनीती, अमेरिकेसारख्या महासत्तेचा निर्णायक हस्तक्षेप आणि पाकिस्तानची गोंधळलेली प्रतिक्रिया, हे सर्वच भारताच्या सामर्थ्यशाली जागतिक स्थानाकडे निर्देश करत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!