
काँग्रेसवर अमित शाहांनी टोकाची टीका करत त्यांची जुनी संस्कारवजा वृत्ती उजेडात आणली. आरोग्य क्षेत्रातील भाजपच्या कामगिरीची त्यांनी आकडेवारीसहित जोरदार तुलना केली.
नागपूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल कँसर इन्स्टिट्यूटच्या ‘स्वस्ती निवास’ या विशेष निवासी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत भाजपच्या आरोग्य क्षेत्रातील भरीव कामगिरीवर प्रकाश टाकला. काँग्रेसचे नेते काहीही बोलतात, कारण हेच त्यांचे संस्कार आहेत. पण आम्ही बोललो तर त्यांना वाईट वाटतं, असा टोला लगावत त्यांनी भाजप सरकारने आरोग्य क्षेत्रात केलेल्या क्रांतिकारक बदलांची तपशीलवार आकडेवारी सादर केली.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. अमित शाह यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या आरोग्य क्षेत्रात झालेल्या ऐतिहासिक बदलांचा आढावा घेतला. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारच्या अखेरच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी अवघी 37 हजार कोटींची तरतूद होती. मोदी सरकारने ही रक्कम तब्बल एक लाख 35 हजार कोटींपर्यंत वाढवली, असे शाह यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, भाजप सरकारने सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी एक लाख कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयांची क्रांती
स्वातंत्र्यानंतर देशात फक्त 11 एम्स अस्तित्वात होते. मात्र, आम्ही गेल्या 11 वर्षांत 23 नवीन एम्सला मान्यता दिली आहे. 2014 पूर्वी देशात फक्त 387 वैद्यकीय महाविद्यालय होते, जे आज 780 वर पोहोचले आहेत, असे सांगत अमित शाह यांनी भाजप सरकारच्या शिक्षण क्षेत्रातील वाढीवरही भर दिला. एमबीबीएस डॉक्टरांची संख्या 51 हजारांवरून आता एक लाख 18 हजारांवर गेली आहे. तर पीजी डॉक्टरांची संख्या 31 हजारांवरून 74 हजारांवर पोहोचली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Amit Shah : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये स्वस्ति निवासची भर
शाह यांनी यावेळी ‘आयुष्मान भारत’ योजनेचा उल्लेख करत सांगितले की, काँग्रेसच्या काळात गंभीर आजारांसाठी सामान्य नागरिक कर्जबाजारी होण्याच्या भीतीने उपचार घेण्यास घाबरत असे. “मोदी सरकारने गोरगरिबांसाठी ५ लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा सुरू केला. भाजप शासित राज्यांनी यामध्ये भर टाकून ही मर्यादा १० लाख रुपये केली आहे. त्यामुळे आज देशातील सुमारे ७ कोटी लोकांना मोफत उपचाराची सुविधा मिळते आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
औषधी दुकानांची साखळी
मोदी सरकारने जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून लाखो कुटुंबांच्या औषध खर्चात मोठी बचत केली आहे. देशभरात स्वस्त औषध दुकानांची साखळी उभारून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला, असेही शाह यांनी ठासून सांगितले. शेवटी काँग्रेसवर निशाणा साधताना त्यांनी नमूद केले, मी हे आकडे सांगितल्यावर काँग्रेसचे नेते खोटं म्हणतील, टीका करतील, पण तेच त्यांचे संस्कार आहेत. आम्ही बोललो तर त्यांना वाईट वाटतं. पण सत्य हे स्पष्ट असतं आणि ते म्हणजे, आरोग्य क्षेत्रात भाजपची कामगिरी काँग्रेसच्या काळाच्या कितीतरी पटीने मोठी आहे.
या कार्यक्रमात अमित शाह यांचा आत्मविश्वास, आकडेवारीसह सादर केलेली माहिती आणि काँग्रेसवर केलेली तोंडातोंडी टीका यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. भाजपच्या ‘डबल इंजिन सरकार’च्या माध्यमातून देशाच्या आरोग्य व्यवस्था अधिक सशक्त होत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.