महाराष्ट्र

Nana Patole : मंत्रालय बुडालं पाण्यात, सरकार उडतय ढगात 

Maharashtra : नाना पटोले यांचा महायुती सरकारवर घणाघाती हल्ला

Author

मुंबईच्या मंत्रालयात शिरलेलं पाणी ही केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर राज्य सरकारच्या बेजबाबदार कारभाराची थरारक निशाणी आहे. नद्यांतून वाहणाऱ्या पुरासोबतच जनतेचा आक्रोशही सत्तेच्या गढीत पोहोचतोय, असा वार नाना पटोले यांनी केला आहे. 

मुंबईतील मंत्रालय पाण्याखाली गेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे हाहाकार उडाला असताना, राज्य सरकार मात्र सत्ता टिकवण्याच्या आणि ‘शो’ करण्याच्या नादात मग्न आहे, असा संतप्त आरोप काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ही नैसर्गिक आपत्ती नाही, ही जनतेच्या रोषाची सुरुवात आहे, अशा शब्दांत पटोलेंनी राज्य सरकारच्या अपयशावर जोरदार टीका केली.

मुंबई पाण्यात आहे, पण याला जबाबदार निसर्ग नाही, तर सरकारची बेशिस्त यंत्रणा आहे, असं मत व्यक्त करत पटोलेंनी फडणवीस सरकारवर खरमरीत टीका केली. मंत्रालयाच्या दारात पाणी पोहोचणं म्हणजे केवळ पाऊस नव्हे, तर धोरणात्मक अपयश आणि भ्रष्ट व्यवस्थेचं दर्शन आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण नद्या स्वच्छ होत नाहीत, रस्ते चांगले होत नाहीत, आणि ड्रेनेज यंत्रणा सुधारत नाही, यालाच विकास म्हणतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शासनाचा लक्षच नाही

पुण्यासारख्या शहरात नद्या रस्त्यांवरून वाहू लागतात, ही केवळ नियोजनशून्यता नाही तर बिल्डर लॉबी आणि सत्ताधाऱ्यांचं संगनमत असल्याचा गंभीर आरोपही पटोलेंनी केला. “उपमुख्यमंत्री अजित पवार अनेक वर्षांपासून पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना हे संकट वेळेवर दिसलं नाही का? की मुद्दाम दुर्लक्ष केलं?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.

रब्बी हंगामात झालेलं गहू, हरभरा, मका, धान आणि फळबागांचं मोठं नुकसान सरकारच्या निष्क्रियतेमुळे वाढलं आहे, असं पटोले म्हणाले. मागच्या वर्षीच्या नुकसानीची भरपाई अजूनही मिळालेली नाही. कागदावर आकडे लिहिले जातात, पण शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रूंना काही फरक पडत नाही. आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा असलेला शेतकरी सरकारच्या जुमलेबाजीला कंटाळला आहे, असेही पटोले म्हणाले.

निवडणुकीचा विसर

गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेतल्या गेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतरही सरकार निवडणूक घेण्यास टाळाटाळ करत आहे. प्रशासकांच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा दाबला जात आहे, आणि सत्ता ही ‘लोकांच्या’ नाही, ‘सत्ताधाऱ्यांच्या’ मर्जीवर चालत आहे, असा थेट आरोप पटोले यांनी केला.

राज्यात पूर आणि दारुण परिस्थिती असताना अमित शहांच्या दौऱ्यासाठी सरकारी यंत्रणा झपाट्याने सज्ज होते. याचा अर्थ स्पष्ट आहे, लोकांच्या मतांनी सत्तेत आलेल्या नेत्यांना लोकांच्या दुःखाशी काहीही घेणं-देणं नाही, असं पटोलेंनी सांगितलं. हाच खरा लोकशाहीचा अपमान आहे. सरकार जनतेचा नाही, तर काही मोजक्या गटांचा ‘सेवक’ बनला आहे, असा आरोप त्यांनी केला.

देशभर चळवळ

जातीनिहाय जनगणनेबाबत राहुल गांधी यांची भूमिका ऐतिहासिक असल्याचं पटोलेंनी स्पष्ट केलं. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढणारे राहुल गांधी हे खरे नेता आहेत. तेलंगणामध्ये सुरू झालेली चळवळ आता संपूर्ण देशभर व्हायला हवी, हीच आमची भूमिका आहे, असं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिलिटरीचे कपडे परिधान करून स्वतःच स्वतःची पाठ थोपटण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही त्यांनी केली. आपल्या शूर सैनिकांनी केलेल्या बलिदानाचं श्रेय स्वतःच्या प्रचारासाठी वापरणं ही राजकीय नीतीची ऱ्हास आहे, असं सांगत त्यांनी विचारलं. दहशतवादी हल्ला होऊ दिला गेला, यासाठी जबाबदार कोण? तिथे सुरक्षा का नव्हती?

राज्याला सावरण्यासाठी नव्हे, तर झाकण्यासाठी धुळफेक सुरू आहे. परंतु जनता आता डोळस झाली आहे. पावसाच्या सरी सरकारवर जनतेचा रोष बनून कोसळत आहेत. हे पाणी नाही, हे जनतेचे अश्रू आहेत. आणि हीच सुरुवात आहे एका नव्या राजकीय पावसाळ्याची.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!