
दर्यापूरमध्ये घरकुल योजनेच्या हप्त्यासाठी सुरू असलेला गोंधळ आता उफाळून आला आहे. लाभार्थ्यांचा संयम सुटला आणि एका थेट कारवाईनं प्रशासनाला हलवून टाकलं.
शासन तुमच्या दारी, पण अनुदान मात्र उंबरठ्यावरच अडलेलं. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यासाठी चकरा माराव्या लागत असल्याने संतप्त झालेल्या जनतेचा आवाज अखेर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने उचलला. दर्यापूर पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या अनास्थेचा आणि संभाव्य भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करत शिवसेना शिंदे गटाने थेट बीडीओंच्या कार्यालयात धडक दिली.
शिवसेनेने यावेळी आक्रमक पवित्रा घेत थेट इशारा दिला. समस्यांचे तात्काळ निराकरण नाही झाले, तर अधिकाऱ्यांना उलटे टांगू. यामुळे समितीतील अधिकारी आणि कर्मचारी चक्रावले. शिवसेनेचा हा थेट इशारा आणि लाभार्थ्यांच्या उपस्थित संतप्त भावना पाहून काही तासांतच अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले.

अडथळे अधिक
पंचायत समितीद्वारे प्रधानमंत्री आवास योजना, रमाई योजना, शबरी योजना अशा विविध योजनांतून घरकुलांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र बँक खातं आणि आधार लिंक नसल्यास किंवा काही लहानशा तांत्रिक कारणामुळे लाभार्थ्यांना महिनोनमहिने हप्त्यासाठी वाट पाहावी लागते आहे.
Akola : मुसळधार पावसात वाहनावर कोसळले झाड, आमदाराने केली सुटका
या योजनांच्या अंमलबजावणीत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. कंत्राटी अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांकडून हप्त्यांच्या मोबदल्यात पैसे मागतात, असा थेट आरोप शिवसेना जिल्हा प्रमुखांनी केला आहे. ते म्हणाले, हे गाव-खेड्यांतील गरीब, अपंग, श्रमिक लोक आहेत. त्यांच्या अश्रूंची किंमत शासनाने समजून घ्यावी. बीडीओ याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसतं. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
बीडीओंचं उत्तर
दरम्यान, या प्रकारावर बीडीओ कालीदास तापी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “टप्प्याटप्प्याने अनुदान वितरण सुरू आहे. काही लाभार्थ्यांचे बँक खाते आणि आधार लिंक नसल्यामुळे उशीर होतो आहे. योजनेतील कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराबाबत आम्ही गंभीर आहोत. कोणालाही लाभ मिळवण्यासाठी पैशांची देवाण-घेवाण करू नये. लाभार्थ्यांनी थेट पंचायत समितीशी संपर्क साधावा.
शिवसेनेच्या धडक कारवाईमुळे ज्या लाभार्थ्यांना महिन्यांपासून वाट बघावी लागत होती, त्यांना थोडाफार दिलासा मिळाला असला तरी, ही केवळ सुरुवात आहे. संपूर्ण गावात, तालुक्यात कोणताही लाभार्थी वंचित राहता कामा नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. या प्रश्नावर सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे.
शासनाच्या योजना म्हणजे जनतेसाठीचा आधार असतो. पण जर तोच आधार अशा पद्धतीने ढासळत असेल, तर लोकशाहीवरचा विश्वास डगमगतो. दर्यापूरमधील घरकुल लाभार्थ्यांच्या व्यथा आणि त्यावरच्या राजकीय प्रतिक्रिया यामुळे एक बाब ठळक झाली. प्रशासनातील अपुऱ्या पारदर्शकतेवर आता जनतेचा संयम सुटू लागला आहे.