
अकोल्याच्या रस्त्यांवर आता कायद्याची चाल तेज झाली आहे, आणि त्यामागे आहे एका तडफदार अधिकाऱ्याचं आगमन. ‘ऑपरेशन प्रहार’च्या नावाने गुन्हेगार थरथरत आहेत, तर जनतेला मिळतोय नव्या आशेचा उजेड.
अकोल्यात नुकतेच पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेले अर्चित चांडक हे नाव आज महाराष्ट्र पोलीस खात्यात एक प्रेरणास्त्रोत बनले आहे. नागपुरात आपल्या शिस्तप्रिय, तडफदार आणि निर्भीड कारवाईसाठी प्रसिद्ध झालेले चांडक आता अकोल्यात आले आहेत. त्यांच्या आगमनाने जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना धडकी भरली आहे, तर जनतेत विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे.
अर्चित चांडक यांनी नुकत्याच घडलेल्या घटनेत, नशेत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने काही नागरिकांना शिवीगाळ केली. ही बाब कुणालाही दुर्लक्षित करता आली असती, पण अर्चित चांडक यांनी तात्काळ त्या कर्मचाऱ्याला निलंबित करून, कायदा सर्वांसाठी सारखा आहे हे ठासून दाखवले. आणि याच क्षणानंतर सुरू झाला “ऑपरेशन प्रहार.”

निगारांच्या छातीत थरकाप
‘ऑपरेशन प्रहार’ ही केवळ एक मोहिम नाही, तर अकोल्यात कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्याची सुरुवात आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी रुजू होताच जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसायांवर लक्ष केंद्रीत करत तात्काळ कठोर कारवाईचे आदेश दिले. गोवंश तस्करी, बेकायदेशीर दारूचा धंदा, मटका-जुगार अड्डे, आणि इतर सर्व प्रकारच्या अवैध कारवायांना मूळापासून नष्ट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला तात्काळ कारवाईचे आदेश देत, यंत्रणेला गती देण्यात आली आहे.
28 मे रोजी, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुखांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाने चान्नी पोलीस स्टेशनच्या आलेगाव परिसरात वरली मटक्यावर मोठी धाड टाकली. या कारवाईत सहा जणांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळीून रोख रक्कम 26 हजार 290, तीन महागड्या मोटरसायकल्स, मोबाईल फोन्स, खुर्च्या, पाण्याचे ड्रम्स असा एकूण दोन लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई केवळ एक सुरुवात आहे, असं सांगत पोलिसांनी गुन्हेगारांमध्ये भितीचं वातावरण निर्माण केलं आहे.
गोमांसासह आरोपी अटकेत
पोलिसांच्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर, बार्शी टाकळी येथील जामा मशीद परिसरात राहणारा शेख शारीक गोवंशाची कत्तल करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्याला रंगेहाथ पकडलं. अंदाजे 310 किलो गोमांस, ज्याची किंमत 63 हजार 570 आहे, तो मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. यासोबतच, 25 मे रोजी गोवंश चोरी प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून एक वाहनसुद्धा जप्त करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईचा एकूण जप्त मुद्देमाल 2.67 लाखांच्या घरात आहे.
पोलीस अधीक्षक चांडक यांच्या मार्गदर्शनात आगामी काळातही मोठ्या प्रमाणात कारवाया होणार आहेत. बेकायदेशीर दारू भट्ट्यांवर धाडसत्र, जुगार अड्ड्यांचा नायनाट, आणि गोवंश तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची जप्ती, हे सगळं ‘ऑपरेशन प्रहार’च्या पुढील टप्प्यात अपेक्षित आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, जनतेत विश्वासाचं नवं पर्व सुरू झालं आहे.
नागरिकांचा सहभाग हवा
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवावा, पोलिसांशी सहकार्य करावं आणि कुठल्याही गुन्हेगारी कृतीबद्दल तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. ही लढाई एकट्या पोलीस दलाची नाही, ही लढाई न्यायाच्या आणि सुरक्षिततेच्या बाजूने उभ्या असलेल्या सर्वांची आहे. अवैधतेचा अंत, आहाराचा आरंभ, असे उद्गार चांडक यांनी काढले.
चांडक यांच्या नेतृत्वातील ऑपरेशन प्रहार हे केवळ एक धाडसी पाऊल नाही, तर अकोला जिल्ह्यातील सुरक्षित, शांततामय आणि कायद्याच्या अधिष्ठानावर उभ्या असलेल्या समाजाच्या निर्मितीकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा आहे. अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली अकोला पोलीस दल नव्याने उभं राहत आहे. अधिक तत्पर, अधिक शिस्तबद्ध आणि अधिक जबाबदार होताना दिसत आहे. अवैधतेवर अखेरचा प्रहार करण्यासाठी जनतेचा सहभाग, पोलिसांची कृती आणि न्यायप्रिय नेतृत्व एकत्र आले, तर कोणतीही गुन्हेगारी ताकद जिल्ह्यात उरकू शकणार नाही. अकोल्याचा नवसंघर्ष सुरू झाला आहे आणि या संघर्षाचं नाव आहे, ऑपरेशन प्रहार!