महाराष्ट्र

Amol Mitkari : मुख्यमंत्र्यांच्या टायमिंगवर मिटकरींनी ठेवले बोट 

Mahayuti : फडणवीस बोलले आणि महायुतीत उडाला धुरळा 

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने महायुतीच्या तंबूत पुन्हा एकदा विसंवादाची झलक दिसली आहे. त्यांच्या ‘दोन्ही उपमुख्यमंत्री संवादात कच्चे’ असल्याच्या टीकेला आमदार अमोल मिटकरी यांनी थेट प्रत्युत्तर देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

महाराष्ट्राच्या सत्तेतील महायुतीत आतल्या गोटात काय सुरू आहे, याचे संकेतच जणू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताज्या वक्तव्याने दिले आहेत. एका मुलाखतीत बोलताना फडणविसांनी दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे संवादात कमी पडतात, असे सांगत महायुतीतील अंतर्गत संवादाभावावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य करत जोरदार पलटवार केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या मतावर नाराजी व्यक्त करताना आमदार अमोल मिटकरी म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे टायमिंग अत्यंत चुकले आहे. संवादाच्या बाबतीत जर काही म्हणायचेच होते, तर ती गोष्ट चार भिंतीच्या आतही सांगता आली असती. माध्यमांसमोर बोलून त्यांनी नेमकी कोणती चुक सुधारायची आहे? दोन्ही उपमुख्यमंत्री संवादात कमी पडतात, हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं. खरंतर संवादाचा अभाव आहे तो मुख्यमंत्र्यांचाच. या विधानाने महायुतीतील एकमेकांबाबतचा विश्वासच डळमळीत होतो.

Vijay Wadettiwar : हे करू, ते करू करणार अन् शेतकरीच सरकारला गाडणार

अंतर्गत तणाव

फडणवीसांना विचारण्यात आलं होतं की, दोघांपैकी कोण उपमुख्यमंत्री संवादात अधिक प्रभावी आहे? यावर उत्तर देताना त्यांनी थेट सांगितलं, अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादक्षम नाहीत. ते पुढे म्हणाले, अर्थात, या विधानाबद्दल ते दोघे मला नक्कीच माफ करतील. या विधानाचा अर्थ लावण्याच्या घाईत राजकीय निरीक्षक आहेत. महायुतीतील तणाव, गोंधळ आणि नेतृत्वातील समन्वयाच्या अभावावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

फडणवीसांवर टीका करतानाच अमोल मिटकरी यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावरही उपहासात्मक टिप्पणी केली. संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदावर दिल्लीहून दबाव असल्याचा दावा केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना मिटकरी म्हणाले, संजय राऊत स्वर्गात असल्यासारखे बोलतात. पुस्तक प्रकाशित झालं की ते अशा अकल्पित विधानांनी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं बोलणं पुस्तकाच्या खपासाठी असतं. आता त्यांच्या विधानांना कोणीही गांभीर्याने घेत नाही.

राजकीय हलचालींना वेग 

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. फडणवीस, शिंदे, आणि पवार या तीन प्रमुख नेत्यांमधील केमिस्ट्रीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होतो आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांचे वक्तव्य केवळ व्यक्तिगत मत नसून, एक संकेत आहे का, असा सवाल राजकीय विश्लेषक उपस्थित करत आहेत. या साऱ्या घडामोडी पाहता, महायुतीतील नातेसंबंध आणि आगामी निर्णयप्रक्रिया याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिलं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!