
गडचिरोलीसारख्या मागास व नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलविण्यास काँग्रेसने आगळावेगळा उपक्रम राबवला आहे.
नक्षलग्रस्त, मागास आणि समस्यांनी त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्याने अनेकदा आवाज उठवला. मात्र, या आवाजाला दिल्ली-मुंबईतून फक्त मौनाचं उत्तर मिळालं. आता मात्र गडचिरोलीकरांनी थेट देवासमोर साकडं घातलं आहे. पण हेतू राजकीय आहे. काँग्रेसने ६ जून रोजी शहरातील प्रसिद्ध सेमाना देवस्थानात महायज्ञ आयोजित केला आहे. कारण एकच मुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीकडे एकदा तरी लक्ष द्यावं. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले होते.
पालकत्व स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील जनतेला त्यांच्या पालकत्वाचा अनुभव फारसा आलेला नसल्याचा आरोप विरोधक करत आहे. ना भेट, ना संवाद, ना निर्णय, त्यामुळे आता काँग्रेसने सत्ता सोडून सत्वाला साद देण्याचा निर्णय घेतला आहे. तेही एका महायज्ञाच्या माध्यमातून. 6 जून रोजी गडचिरोलीतील सेमाना देवस्थानात महायज्ञाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महायज्ञातून देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोलीत येण्याचे ‘आवाहन’ नाही, तर ‘आकर्षण’ करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र बामनवाडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, सरकारची दारे बंद असतील तर देवाच्या दाराशी यावं लागतं, म्हणूनच आम्ही महायज्ञाच्या मार्गावर चाललो आहोत.

फक्त घोषणांचा पाऊस
जिल्ह्याचे प्रश्न काहीसे अरण्यरुदन सारखे झाले आहेत. रानटी हत्ती, वाघ, अस्वल यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं उध्वस्त आयुष्य, आणि त्यातही वीजपुरवठ्याचं अपयश हे सगळं गडचिरोलीच्या शेतीला धक्का देत आहे. तीन वर्षांपासून या प्रश्नांना कोणतंही ठोस उत्तर मिळालेलं नाही. यामुळे जनतेत अस्वस्थता, शेतकऱ्यांत हतबलता आणि युवा वर्गात बेरोजगारीचं सावट वाढलं आहे.पण या सगळ्याला उत्तर म्हणून राज्यशासनाकडून केवळ ‘शासन आपल्या दारी’ अशा घोषणांची पुनरावृत्ती केली जाते.
प्रत्यक्षात मात्र पालकमंत्री ‘जिल्ह्याच्या बाहेरचं पालकत्व’ निभावत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जिल्ह्यात रानटी हत्तींचा उपद्रव, अवकाळी पावसाचे नुकसान, अपुरी वीज, रोजगाराचा अभाव, आणि रस्त्यांची दुरवस्था या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, बोनस, तसेच रोजगार हमीची थकीत मजुरी मिळावी, वाळूचा काळाबाजार थांबवावा, स्थानिकांना रोजगार मिळावा अशा मागण्या काँग्रेसने मांडल्या आहेत. मुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारूनही आजवर भेट दिलेली नाही. त्यामुळे काँग्रेसने श्रद्धेच्या माध्यमातून सरकारला जागं करण्याचा संवेदनशील मार्ग स्वीकारला आहे.
आगळ्यावेगळ्या आंदोलनाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे.ही संकल्पना सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चेत आहे. काहींनी या पद्धतीला कौतुकाची थाप दिली असून, राजकारणाची दिशा बदलणारी श्रद्धा असं संबोधलं आहे. तर काहींनी या पावलाला नाटकी राजकारण म्हणून हिणवलं आहे.