प्रशासन

Nagpur : कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून उमटला निवडणुकीचा गंध

Pravin Datke : नागपूरच्या गल्लीगल्लीत भाजपची स्वच्छता मोहीम

Author

नागपूरमध्ये सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या कचऱ्यामुळे स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भाजपचे नेते संदीप जोशी आणि प्रवीण दटके यांनी प्रशासनावर टीका करत कारवाईची मागणी केली आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली दबलेलं नागपूरचे सौंदर्य आता राजकीय रणधुमाळीचे केंद्र बनले आहे. स्वच्छता हा मुद्दा फक्त घोषणांपुरता राहिल्याची परिस्थिती आहे. नागपूरच्या रस्त्यांवर सध्या कचरा, दुर्गंधी, माशा आणि डास यांचं ‘राज्य’ असल्याची तिखट टीका भाजप नेते संदीप जोशी यांनी केली होती. सात हजारांहून अधिक सफाई कर्मचाऱ्यांचा कर्मचारी वर्ग असूनही, शहरात वाढलेली अस्वच्छता पाहता महानगरपालिका झोपेत आहे का, असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला विचारत प्रशासनाच्या कार्यशैलीवर घणाघात केला आहे.

शहरात गटारांची स्थिती दयनीय असून, पावसाच्या तोंडावर स्वच्छतेच्या बाबतीत बेपर्वाईचा आरोप सत्ताधाऱ्यांच्या दिशेने होत आहे. विशेष म्हणजे सलग १५ वर्ष सत्तेत असलेल्या भाजपने अशा स्वरूपाची थेट टीका केली नसल्यामुळे, जोशी यांच्या विधानांनी खळबळ उडवली आहे.फक्त जोशी नव्हे, तर मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनी देखील नागनदी स्वच्छतेच्या मुद्द्यावरून प्रशासनाला धारेवर धरले. बैठक घेऊन अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले जात आहेत. विशेष म्हणजे हे दोघंही माजी महापौर असून, शहराच्या यंत्रणेची पुरेशी ओळख आणि अनुभव त्यांच्या गाठीत आहे. मग प्रश्न असा की, ही भूमिका आताच का?

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंना बोलबच्चनची उपाधी

तीन वर्षांची नकारात्मकता

मागील तीन वर्षांत प्रशासन तितकंच नकारात्मक होतं, पण कुठेच सार्वजनिक आवाज ऐकू आला नाही. राजकीय वर्तुळात यावर चर्चेला उधाण आलं आहे. महापालिका निवडणूक  चार महिन्यांवर आली आहे. त्यामुळे ही ‘प्रशासनविरोधी मोहीम’ जनतेच्या संतापाचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा संशय उपस्थित होतो आहे. 2007 पासून 2022 पर्यंत भाजप महापालिकेवर एकहाती सत्तेवर होता. त्या काळात नागपूरकरांच्या तक्रारी, नाराजी वारंवार समोर येत होतीच, पण भाजपच्या नेत्यांनी फारशी उघडपणे प्रशासनाविरुद्ध भूमिका घेतली नव्हती. एक अपवाद म्हणजे आमदार कृष्णा खोपडे.

बाकी नेते मात्र शांतच होते. पण आता अचानक एकच सुरात टीका सुरू झाली आहे. तीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत नागपूरकरांना पायाभूत सुविधांपासून वंचित राहावं लागलं. दोन वर्ष महापुरात शहर बुडालं, रस्त्यांचे खोदकाम, स्वच्छतेचा अभाव, आणि वाढलेला सार्वजनिक राग यामुळे लोकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप साठला. तेव्हा माजी नगरसेवकांनाही या रागाचा फटका बसला. आता निवडणुकीचे आदेश सुप्रीम कोर्टाकडून आल्याने, भाजपला जनतेचा राग परवडण्याजोगा वाटत नाही. त्यामुळेच भाजप आमदार थेट मैदानात उतरले आहेत. प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवून ‘साफसफाई’चा मुद्दा हायलाईट करत आहेत.

Chandrashekhar Bawankule : टोमण्यांचं आयुष्य जगणाऱ्यांना महाराष्ट्र ओळखतो

नागपूरच्या रस्त्यांवर दिसणारा कचरा ही केवळ नागरी समस्या नसून, आता ती निवडणूकपूर्व राजकारणाची रंगभूमी बनली आहे. भाजप आमदारांनी उघडपणे प्रशासनावर निशाणा साधल्याने, आतापर्यंत न दिसणारी भूमिका एकाएकी समोर येत आहे. ही भूमिका नागपूरकरांच्या हितासाठी आहे की निवडणूकपूर्व रणनीतीचा भाग, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण सध्या इतकं मात्र नक्की कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमागे राजकारणाची बरीच गोष्ट लपलेली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!