महाराष्ट्र

Devendra Fadnavis : सरकार कर्जमाफीचा शब्द पाळणारच

Farmers Issues : फडणवीसांनी घेतली गंभीर दखल

Author

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात कर्जमाफी, शिक्षण आणि वारकरी संप्रदायाबाबत ठाम भूमिका मांडली. योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी सरकारचा शब्द पाळला जाईल, असे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात आयोजित जागतिक योग दिन कार्यक्रमात सहभागी होताना शेतकऱ्यांपासून शिक्षण क्षेत्रापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सरकारने जे आश्वासन दिले आहे, त्याची पूर्तता योग्यवेळी केली जाईल, अशी ठाम ग्वाही फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी पुणे विद्यापीठाच्या जागतिक कीर्तीच्या यशाचे कौतुक करत फडणवीस यांनी विद्यापीठाचा दर्जा अधिक उंचावण्याचा विश्वासही व्यक्त केला. वारी, योगदिन, शेतकरी कर्जमाफी, आळंदीतील धार्मिक परंपरा आणि प्रशासन या सर्व मुद्द्यांवर त्यांनी संतुलित भाष्य करून एक समर्पित आणि लोकहितवादी नेतृत्वाची छाप सोडली.

Amravati : पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ कारभारामुळे आरोग्यावर गदा

योगदिनी वारकऱ्यांसोबत एकात्मता

पुण्यातील भव्य योग दिन कार्यक्रमात सहभागी झाल्यावर फडणवीस यांनी सांगितले की, वारी ही महाराष्ट्राची प्राचीन आणि गौरवशाली परंपरा आहे. लाखो भाविक पायी चालत विठ्ठल भेटीसाठी येतात. या भाविकांचा पुण्यातील मुक्काम आणि त्यात योग दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाने सजलेला कार्यक्रम ही एक प्रेरणादायी एकात्मता होती. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदिन मान्यता मिळवून देण्यासाठी आभार मानले.

फडणवीस यांनी पुणे विद्यापीठाचे जगातील पहिल्या 600 विद्यापीठांमध्ये स्थान मिळाल्याबद्दल विशेष अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, या विद्यापीठाची प्रगती सुसंगत असून लवकरच ते पहिल्या 500 विद्यापीठांत सामील होईल. कुलगुरू, व्यवस्थापन परिषद, सिनेटर आणि प्राध्यापकांचे योगदान त्यांनी विशेष उल्लेख करून गौरवले. शिक्षकांच्या तुटवड्याच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य करत सांगितले की, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी आवश्यक त्या सर्व मान्यता यापूर्वीच दिल्या आहेत. यामुळे लवकरच विभागांची स्थिती सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Harish Pimple : मूर्तिजापुरात बस सेवेच्या माध्यमातून जोडली नवी स्वप्नं

हेटाळणीप्रकरणी गंभीर दखल

कर्जमाफीबाबत सरकारने घेतलेली भूमिका फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केली. सरकार दिलेला शब्द पाळेलच, त्यात चुकण्याची शक्यता नाही, हे ते स्पष्टपणे म्हणाले. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल. त्यासाठी योग्य नियोजन सुरू आहे. पूरस्थिती नियंत्रणासाठी राज्य शासन सज्ज आहे. शेजारील राज्यांशी समन्वय ठेवला जात आहे. धरण व्यवस्थापन आणि विसर्गाचे नियंत्रण यावर देखील लक्ष केंद्रित आहे.

मुख्यमंत्र्यांनी आळंदीतील कत्तलखान्याच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, आळंदीमध्ये कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी आरक्षण हटवण्याचे आदेश दिले असून, वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा पूर्ण सन्मान राखण्यात येईल.

पत्रकारांवरील हेटाळणीप्रकरणी आलेल्या तक्रारींबाबत फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. तणावजन्य प्रसंगांमुळे अशा गोष्टी घडू शकतात, पण त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा संस्थांतील नियुक्त्या सरकार नव्हे तर न्यायिक प्रक्रियेद्वारे होतात, हे त्यांनी नमूद केले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!