
गोंदिया जिल्ह्यातील विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामावर काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी ठाम भूमिका घेत जनहितासाठी आवाज बुलंद केला आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या विकासाच्या गतीला धक्का देणाऱ्या घटनांवर आता लोकप्रतिनिधी स्वतः मैदानात उतरले आहेत. नुकत्याच राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या भेगांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाली होती. या गंभीर प्रकाराची दखल घेत काँग्रेसचे गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी रस्त्याची पाहणी करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र हे प्रकरण ताजं असतानाच, त्यांनी गोंदिया गुडमा रेल्वे स्थानकाजवळ नव्याने बांधण्यात येणाऱ्या ओव्हर ब्रिजच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
प्रत्यक्ष पाहणी करत असताना त्यांनी बांधकामाची स्थिती, प्रवाशांच्या सुरक्षेची स्थिती आणि सुविधा यांचा सखोल अभ्यास केला आणि या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. खासदार पडोळे यांनी पाहणी दरम्यान स्पष्टपणे निदर्शनास आणले की, ओव्हर ब्रिज मध्ये योग्य पावसाचे पाणी निघण्याची सिंचन व्यवस्था नाही. रस्त्यावर गिट्टी पूर्णपणे उघड्यावर आहे. यामुळे चालताना किंवा वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या कामात पूर्णपणे हलगर्जीपणा करण्यात आला आहे. संबंधित विभागाने यावर कोणतीही तत्काळ कृती केलेली नाही.

Operation Thunder : मारुती स्विफ्ट मध्ये स्मगलिंगचा स्पीड ब्रेकर
केंद्रीय मंत्र्यांकडे लक्ष
गंभीर स्थितीबाबत त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष लक्ष वेधलं असून दोषी कंत्राटदारांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. कामाचा दर्जा म्हणजे जनतेच्या सुरक्षेचा पाया आहे. त्यावर कोणताही तडजोड मान्य नाही, असं ठाम मत त्यांनी मांडलं.हे एकटे प्रकरण नाही. काही दिवसांपूर्वीच डॉ. पडोळे यांनी भंडारा जिल्ह्यातील कारधा पूलाचीही पाहणी केली होती. या पुलावर रस्त्याचा लोखंडी भाग उघड्यावर असल्यामुळे अपघात घडत आहेत. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वीच एक अपघात झाला असून पुलावरचे विजेचे दिवे बंद आहेत.
सुरक्षा भिंती तुटलेल्या आहे. संपूर्ण स्थिती भीतीदायक आहे.या समस्यांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. मी पूर्वीही सूचना दिल्या होत्या, पण काहीच कारवाई झाली नाही, असं सांगत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली.जर ओव्हर ब्रिजचं काम वेळेत पूर्ण झालं नाही, तर आम्ही जनतेला घेऊन रस्त्यावर उतरू, असा थेट इशाराही त्यांनी दिला. स्थानिकांनी या निकृष्ट कामाबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही ठोस कृती न झाल्याने त्यांनी ही भूमिका घेतली आहे.