
(या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी ‘द लोकहित लाईव्ह’ सहमत असेलच असे नाही).
शहरात अंमली पदार्थांचा वापर सातत्याने वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. या धोकादायक प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवत तरुणांना या विघातक विळख्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत नागपूर शहर पोलिस दलातील अतिरिक्त पोलिस आयुक्त तथा वरिष्ठ आयपीएस अधिकारी वसंत परदेशी यांचा खास लेख
अंमली पदार्थ हे फक्त एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण समाजाच्या धोक्याचे मूळ आहेत. या विषारी सवयीचा जाळा लोकांच्या आयुष्याला जणू काही जाळून टाकतो. गुन्हेगारी वाढविण्यापासून ते आरोग्यावर व आर्थिक स्थैर्यावर खोल परिणाम करण्यापर्यंत, अमली पदार्थ समाजाच्या प्रत्येक थरावर आपला नकारात्मक ठसा सोडतात. म्हणूनच, जगभरातील पोलीस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था या अमली पदार्थविरोधी मोहिमांना सर्वोच्च महत्त्व देतात. त्यांचा उद्देश असतो या विषाणूप्रमाणे पसरलेल्या समस्या थांबवून समाजाला सुरक्षित करणे.

7 डिसेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने 26 जून हा दिवस ‘अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध आणि अवैध तस्करीविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून घोषित केला. हा दिवस चीनमधील पहिल्या अफू युद्धाच्या स्मरणार्थ निवडण्यात आला. जिथे अफूच्या व्यापारावर बंदी घालण्याचा संघर्ष सुरू झाला होता. यापासून या दिवसाने जागतिक स्तरावर अमली पदार्थांच्या विरोधात जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू केले आहे. अंमली पदार्थ अनेक प्रकारात आढळतात. हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस, अफू, एमडी, मेफेड्रोन आणि विविध गोळ्या यांसारखे अनेक पदार्थ. शरीर आणि मनावर त्यांचा वेगवेगळा परिणाम असला तरी, शेवटी त्यांच्या परिणामांचा एकच सारांश आहे ‘विध्वंस’. हे पदार्थ जसे शरीराचे अंग-प्रत्यंग उद्ध्वस्त करतात.
Devendra Fadnavis : शक्तिपीठ महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी
समाजातील जागरूकता
मानसिक आणि सामाजिक आरोग्यावरही हे पदार्थ घातक परिणाम करतात. त्यांच्या नशेमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते. यकृत, फुफ्फुसे, हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांना धोका निर्माण होतो. मानसिक स्वास्थ्यही धोक्यात येते. व्यक्ती नैराश्याने ग्रासलेली, चिडचिडी आणि भ्रमाने ग्रस्त होते. परिणामी, व्यक्ती सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातून दूर पडते. आर्थिक संकटात सापडते आणि गुन्हेगारीकडे वळण्याचा धोका वाढतो. अंमली पदार्थांच्या व्यसनात लोक का सापडतात? यामागे अनेक कारणे असतात. कुतूहल, ताणतणाव, वाईट संगती, सहज उपलब्धता आणि कुटुंबातील कलह. तरुणांमध्ये प्रायः उत्सुकतेमुळे किंवा ताणतणावातून सुटका शोधण्याच्या हेतूने हे व्यसन वाढते.
एकदा जाळ्यात अडकल्यावर त्यातून बाहेर पडणे अतिशय कठीण असते. यावर नियंत्रण आणण्यासाठी जनजागृती हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. शाळा, महाविद्यालये आणि समाजात अमली पदार्थांच्या धोका आणि दुष्परिणामांविषयी सातत्याने माहिती दिली पाहिजे. कठोर कायदे अंमलबजावणीसाठी असणे आवश्यक आहे. व्यसनाधीनांना समुपदेशन, वैद्यकीय उपचार आणि पुनर्वसनाची सुविधा देणे गरजेचे आहे. जेणेकरून ते पुनःसुरुवात करू शकतील.नागपूर शहर पोलीस दलाने ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेची सुरुवात केली आहे. ज्याचा उद्देश शहराला अमली पदार्थमुक्त करणे आहे. या मोहिमेत तस्करांच्या पुरवठा साखळ्या तोडणे, छापेमारी, अटक, सीमा सुरक्षा कडक करणे आणि लोकांमध्ये जागरूकता वाढविणे यावर भर दिला जात आहे.
Harshwardhan Sapkal : पंढरीच्या रस्त्यावर चाललंय बळीराजासाठी राजकीय हरिपाठ
अदृश्य शत्रूविरुद्ध लढा
समुपदेशन आणि पुनर्वसनाचा महत्त्वाचा भाग असून व्यसनातून बाहेर पडणाऱ्या लोकांना मदत केली जाते. या मोहिमेच्या यशासाठी पोलीस, आरोग्य, शिक्षण आणि समाजसेवा यांची समन्वित कामगिरी अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः शाळांमध्ये व्यसनमुक्त उपक्रम राबवून तरुणांना सकारात्मक मार्गावर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारणच, अंमली पदार्थांविरुद्धचा संघर्ष हा दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण असतो. ज्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक आहे.अंमली पदार्थांचा जाळा फक्त व्यक्तीपुरता मर्यादित नाही. तो संपूर्ण समाजाचा विनाश करतो. त्यामुळे, आपण सर्वांनी या अदृश्य शत्रूविरुद्ध जागरूक होऊन, मदतीचा हात पुढे करत, ‘ऑपरेशन थंडर’ सारख्या मोहिमांना पूर्ण पाठिंबा द्यावा. एकत्रित प्रयत्नांनीच आपण आपल्या समाजाला सुरक्षित आणि निरोगी बनवू शकतो.