
अकोल्यातील राज राजेश्वर संस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर या यशावर भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेय घेण्याचा तणाव वाढला आहे.
राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असताना अकोल्यात मात्र राजकीय तापमान काहीसे जास्तच वाढले आहे. याचे कारण ठरतेय अकोल्याच्या आराध्य दैवत असलेल्या राज राजेश्वर संस्थानाला मिळालेला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा. या निर्णयामुळे शहराचा धार्मिक आणि सांस्कृतिक चेहरा उजळणार असताना, राजकीय श्रेयाची चुरस मात्र तुफान रंगली आहे. शहराच्या विकासासाठी भाजपने मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक नगरसेवकांपर्यंत प्रत्येकजण या विषयात सक्रिय होता. विशेषतः आमदार रणधीर सावरकर यांनी वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.
अखेर या प्रयत्नांना यश मिळाले आणि राज राजेश्वर संस्थानाचा विकासाचा मार्ग मोकळा झाला. पण या घोषणेनंतरच राजकारणात नवा वाद पेटला. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी देखील यासाठी सतत पाठपुरावा केल्याचा दावा केला. त्यांनीही आपला सहभाग अधोरेखित करत हे यश आपल्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न केला. परिणामी भाजप आणि काँग्रेसमध्ये यावरून खुलेआम ‘श्रेयनाट्य’ रंगायला लागले आहे. भाजपच्या वतीने एक परिपत्रक काढून स्पष्ट करण्यात आले की, आमदार सावरकर यांनी 16 जून रोजी मुख्यमंत्र्यांना अधिकृत पत्र देत ‘ब’ वर्ग दर्जा आणि 50 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यासाठी निधीची मागणी केली होती.

Vijay Wadettiwar : मनुस्मृतीच्या सावलीत संविधानाचा दिवा लावण्याचं नाटक
धार्मिक वारसा जपणे
मागणीनंतर केवळ दोन दिवसांत म्हणजे 18 जून रोजी मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव (नगर विकास) यांना तातडीच्या सूचना दिल्या. 23 जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा विकास आराखडा नगरविकास विभागाकडे सादर केला. भाजपने हा संपूर्ण वेळापत्रक पुराव्यासह मांडत काँग्रेसच्या दाव्यांना प्रत्युत्तर दिले. राज राजेश्वर संस्थानाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या ५० कोटींच्या आराखड्यात मंदिराचे भव्य स्वागतद्वार, गाभारा-सभामंडपाचा नवा चेहरा, पाच मजली भक्तनिवास, प्रसादगृह, दर्शन पोचमार्ग, रस्त्यांचे सौंदर्यीकरण, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छता व पेयजल सुविधा, पार्किंग आणि दिंडी प्रवचनासाठी प्रेक्षक गॅलरी यासारख्या सुविधांचा समावेश आहे.
विकास कामांमुळे केवळ धार्मिक वारसा जपला जाणार नाही, तर श्रावण महिन्यात होणाऱ्या कावड यात्रेला देखील अधिक चांगली सोय आणि भव्य स्वरूप मिळणार आहे. या तीर्थक्षेत्राच्या दर्जामागे भाजपचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी सर्वप्रथम राज राजेश्वर संस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा, ही ठाम मागणी मांडली होती. त्यांनी आयुष्यभर यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दिवंगत गोवर्धन शर्मा यांचे हे स्वप्न अखेर साकार झाले आहे. त्यांच्या इच्छेला मूर्त स्वरूप देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सध्या अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून आज हा ऐतिहासिक निर्णय प्रत्यक्षात उतरला आहे.
Nagpur : एव्हिएशनच्या आकाशात ‘ड्रीम रन’, पण ग्रामीण भागात ‘नो जॉब फन’
महायुती सरकारचा श्रेय
यशाचा मान नेमका कुणाला द्यायचा, यावरून अकोल्यात चांगलीच खडाजंगी सुरू आहे. एकीकडे भाजपने पुरावे सादर करत हे यश आमदार सावरकर यांच्या नावावर लावले, तर दुसरीकडे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण हे देखील आम्ही मागे नाही असं ठामपणे मांडत आहेत. अकोल्यात काही दिवसांपूर्वी मोठी दंगल झाली होती. त्यावेळी इतिहासात पहिल्यांदाच जमावाने राजेश्वर मंदिरावर दगडफेक केली होती. त्यांची भरपाई करण्याचा प्रयत्न आमदार साजिद खान पठाण यांनी केला. पण मंदिरासाठी जाहीर झालेल्या योजनेचे खरे श्रेय भाजप सत्तेत असलेल्या महायुती सरकारला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना असा कोणताही प्रस्ताव नव्हता असे नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्थात, स्थानिक नागरिकांसाठी आणि लाखो भाविक भक्तांसाठी या राजकारणापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे श्री राज राजेश्वर संस्थानाचा दर्जा आणि विकासाचे दार खुले होणे. मात्र, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर या यशाचं राजकीय भांडवल करण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रयत्न पाहता, अकोल्यात ‘श्रेयनाट्य’ अजून काही काळ रंगत राहणार हे नक्की.
Ravinder Singal : एका आईच्या अश्रूंनी मोजली हजारो घरांच्या परिवर्तनाची किंमत