
चिखली तालुक्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीसाठी सरसकट भरपाई मिळावी, अशी ठाम मागणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी अधिवेशनात केली.
मुंबईत सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधींनी दिलेला लढा अधिकच ठळकपणे समोर येत आहे. 30 जूनपासून सुरू झालेल्या अधिवेशनात शेतकरी प्रश्न, पावसामुळे झालेले नुकसान आणि कर्जमाफी या मुद्द्यांवर सभागृहात प्रखर आवाज उठवण्यात येत आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा अत्यंत ठामपणे मांडत सरकारकडे नुकसानभरपाईची स्पष्ट मागणी केली.
24, 25 आणि 26 जून या तीन दिवसांत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, मेहेकर आणि चिखली तालुक्यांत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली. यामुळे फळभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले. कारली आणि दोडकेसारख्या हंगामी भाजीपाला पिकांचे वेल उध्वस्त झाले. चिखली तालुक्यातील आठ मंडळांमध्ये हे नुकसान अधिक असल्याने, तेथील शेतकऱ्यांना त्वरित आणि सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार श्वेताताईंनी केली. मुंबईतील विधिमंडळात सभापती महोदयांनी बुलढाणा जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींना बोलण्याची संधी दिली. याचा फायदा घेत आमदार श्वेता महाले पाटील यांनी चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा सभागृहापर्यंत पोहोचवल्या.

पालकमंत्र्यांचे आश्वासन
मुद्यावर उत्तर देताना बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनीही अधिवेशनात स्पष्ट आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, चिखली तालुक्यात जिथे-जिथे नुकसान झाले आहे, तिथे शासकीय नियमांनुसार आवश्यक ती नुकसानभरपाई नक्कीच दिली जाईल. मात्र, केवळ आश्वासनावर न थांबता, आमदार श्वेताताईंनी वैरागड, हरणी, शेलगाव जहागीर या गावांमध्ये झालेल्या नुकसानाचा तपशीलवार उल्लेख करत सरकारसमोर ठोस मुद्दे मांडले. कारली, दोडके यांचे वेल पूर्णतः जमीनदोस्त झाले असून, ही हानी आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी असह्य आहे, याचे भान त्यांनी सभागृहात दाखवले.
तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये शेताच्या बांधांचा पूर व पावसाने खच झाल्याचा मुद्दा देखील आमदार श्वेताताईंनी उपस्थित केला. त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेली संपूर्ण हानी सरकारपुढे सादर करत, शेतकऱ्यांना संपूर्ण मदत देण्याची मागणी केली. या मुद्द्यावर तात्काळ हालचाली होऊन पंचनामे, अहवाल आणि निधी वितरण जलदगतीने व्हावा, यासाठीही त्यांनी आग्रही भूमिका घेतली. शेतकरी हितासाठी कटिबद्ध आमदार श्वेता महाले पाटील यांनी अधिवेशनात आवाज बुलंद केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या मुद्द्यावर त्यांनी केवळ राजकारण न करता, संपूर्ण सामाजिक भान ठेवून बोलणे ही त्यांची विशिष्ट शैली या अधिवेशनात दिसून आली.
Sajid Khan Pathan : आश्वासने अपूर्ण; सभागृहाची प्रतिमा मलीन?