जनसंपर्काचा अर्थ केवळ तक्रारी ऐकणे नाही, तर माणसांच्या व्यथांना प्रतिसाद देणे होय. नागपूरमध्ये एका भावूक पत्राने नितीन गडकरी यांच्या माणुसकीच्या कार्यशैलीची पुन्हा एकदा प्रचिती दिली.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची कामाची पद्धत केवळ प्रशासकीय नाही, तर ती माणुसकीच्या पायावर उभी आहे. प्रशासन, विकास आणि जनसंपर्क यांना एकत्र बांधणाऱ्या या कार्यशैलीमुळे अनेक नागरिकांचा विश्वास त्यांच्यावर आहे. नागपूरमध्ये रविवारी पार पडलेल्या जनसंपर्क अभियानात याचे एक जिवंत उदाहरण समोर आले.
जनसंपर्कात नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. गडकरी यांनी आलेल्या निवेदनांची गांभीर्याने दखल घेत, थेट संबंधित अधिकाऱ्यांकडे ती पाठवून तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. अनेक तक्रारींचे त्याच दिवशी निराकरणही करण्यात आले. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये एक पत्र गडकरी यांच्यापर्यंत पोहोचले. त्यातल्या शब्दांनी सभागृहातील वातावरण भावूक केले.
Parinay Fuke : क्राईम फाईटरला संसदेत पाहून आमदारांचा शब्दवर्षाव
समस्या निवारण
खामला येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या उपक्रमात नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हाधिकारी कार्यालय, समाज कल्याण विभाग, भूमापन, जिल्हा परिषद, भूमी अभिलेख आणि इतर संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, नागरी सुविधा, शासकीय योजनांशी संबंधित निवेदने सादर केली. गडकरी यांनी सर्व तक्रारींची सखोल माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधत अनेक समस्यांचे तत्काळ निवारण केले. खेळाडूंच्या यशाचे कौतुक करत, तरुणांच्या नवकल्पनांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमात गडकरी यांना एका महिलेचे पत्र मिळाले. पत्र वाचल्यानंतर उपस्थितांची मने द्रवली. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या या महिलेने आपल्या आर्थिक अडचणी सांगत, औषधोपचारासाठी गडकरींना मदतीसाठी संपर्क साधल्याचे नमूद केले. गडकरी यांनी कोणताही वेळ न घालवता संबंधित यंत्रणांमार्फत महिलेच्या उपचारासाठी तातडीने मदत केली. याबद्दल ती महिला आपल्या पत्रात म्हणते, माझ्या उपचारासाठी लागणारे औषध अत्यंत महाग आहे. माझी परिस्थिती हलाखीची असून, आशा संपत चालली होती. मात्र आपणास संपर्क साधताच मदतीचा हात पुढे आला. त्यामुळे माझा जीव वाचण्याची आशा पुन्हा निर्माण झाली. यासाठी मी आपली मनःपूर्वक आभारी आहे.
सेवा म्हणजे संवेदनशीलता
राजकारण म्हणजे केवळ घोषणांची शर्यत नसून, ते लोकांच्या वेदनांशी जोडलेले असते, हे गडकरी वारंवार सिद्ध करत आहेत. त्यांच्या कार्यशैलीत संवेदनशीलता ही मूलभूत बाब आहे. नागपूरसारख्या शहरात लोकांशी थेट संवाद साधणं आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणं ही त्यांची विशेषता ठरते. या पत्राच्या माध्यमातून एक सामान्य नागरिकाने माणुसकीची आशा, सन्मान आणि साक्षात देवत्व अनुभवले. गडकरींचा कार्यसंस्कार केवळ रस्त्यांपुरता मर्यादित न राहता, तो माणसांच्या मनात मार्ग निर्माण करणारा ठरत आहे.