राहुल गांधी यांच्या ‘गुब्बारा’ टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. मोदी म्हणजे ‘विकासाचा रोड शो’ असून राहुल यांची टीका म्हणजे राजकीय नैराश्याचं प्रतीक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
नवी दिल्लीच्या राजकारणात सध्या वादळ निर्माण करणारा मुद्दा म्हणजे राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका. ‘गुब्बारा’ असा शब्द वापरून राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधींच्या टीका म्हणजे राजकीय अपरिपक्वतेचं, नैराश्याचं आणि त्यांच्या अपयशाचं जिवंत उदाहरण आहे, अशा ठाम शब्दांत बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ ‘शो’ करणारे नेता नाहीत, ते म्हणजे ‘विकासाचा रोड शो’ आहेत. त्यांचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक योजना देशाच्या प्रगतीला वाहिलेली आहे. देशाने सलग तीन वेळा मोदींवर विश्वास टाकला आहे आणि तो विश्वास आकड्यांवर आधारित आहे, भाषणांवर नव्हे.”राहुल गांधी यांनी मोदींना ‘गुब्बारा’ म्हणणे म्हणजे केवळ व्यक्तिविरोधी टीका नाही, तर भारताच्या 140 कोटी जनतेने निवडलेल्या नेतृत्वाचा अवमान असल्याचेही बावनकुळे यांनी नमूद केले.
कामगिरीची उदाहरणे
तुमच्या पक्षाचा ‘हवेचा फुगा’ जनतेने 10 वेळा फोडला आहे,” अशी उपरोधिक टिप्पणी करत बावनकुळे यांनी आठवण करून दिले की, काँग्रेसचा जनतेतला प्रभाव केव्हाच संपुष्टात आलेला आहे. राहुल गांधी, हा देश तुमच्या भाषणांवर चालत नाही. तो आकड्यांवर, कामांवर आणि जनतेच्या विश्वासावर चालतो, असे ठाम विधान करत त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीची उदाहरणे दिली. त्यांनी सांगितले की, 25 कोटी नागरिकांना गरिबीरेषेच्या वर आणणे. 80 कोटींहून अधिक जनतेला मोफत अन्नधान्य देणे. भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली प्रतिष्ठा ही आकडेवारी नसून, जनतेच्या जीवनात घडलेली क्रांती आहे.
राहुल गांधी म्हणजे दिशाभूल, तर मोदी म्हणजे दिशा, असे ठाम शब्दांत बावनकुळे यांनी राजकीय चित्र स्पष्ट केलं. देशाची जनता हे ओळखते आणि म्हणूनच तिने पुन्हा मोदींवर विश्वास टाकला आहे. मोदींचे नेतृत्व म्हणजे केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान उंचावणारा प्रवास आहे, असे सांगताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खरमरीत शब्दांत टीका केली.
जनतेचा अपमान
बावनकुळे यांनी असा सवालही उपस्थित केला की, तुम्ही पंतप्रधानांविषयी ज्या प्रकारे अपमानास्पद भाषा वापरत आहात, ती देशातील 140 कोटी जनतेच्या निर्णयाचा अवमान नाही का? त्यांच्या मते, ही टीका म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वातली निराशा, दिशाहीनता आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व वाचवण्याची धडपड आहे. ही केवळ राजकीय टीका नाही, ही जनतेच्या विवेकशक्तीची अवहेलना आहे, असे ते म्हणाले. एकंदरीतच, चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रत्युत्तरातून राहुल गांधींच्या टीकेला फुसका ठरवत, भाजपचा स्पष्ट आणि आक्रमक संदेश दिला आहे. देश आता ‘गुब्बाऱ्यां’च्या मागे धावत नाही, तो ‘विकासाच्या रोड शो’ मध्ये सामील झाला आहे.