रामटेकच्या गडावर विकासाचा नवा सूर्योदय उगवण्याची चाहूल लागली आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी रोपवेपासून लेझर शोपर्यंतच्या प्रकल्पांना वेग देत, डिसेंबरपर्यंत सर्व कामे मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला.
रामटेकच्या गडावरून उगवणारा सूर्योदय आता फक्त सौंदर्याचा नाही, तर विकासाचा संदेशही देणार आहे. राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विकास आराखड्याच्या टप्पा-दोन संदर्भातील आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले की, रामटेकचा चेहरा बदलायचा आणि तो बदल आता उंबरठ्यावर आहे.
बैठकीत रामटेकच्या प्रगतीला अडथळा ठरणाऱ्या प्रत्येक तांत्रिक आणि प्रशासकीय गाठीला हात घालण्याचा निर्धार करण्यात आला. रोपवे प्रकल्पास अद्याप राज्य पुरातत्त्व विभागाची हिरवी झेंडी मिळालेली नसली, तरी जयस्वालांनी खात्री दिली की, तांत्रिक कारणांचा सखोल आढावा घेऊन लवकरच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल. पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा हा रोपवे, भविष्यातील रामटेकचा ‘गेम चेंजर’ ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कामांना प्रत्यक्ष गती
जयस्वाल यांनी विकास आराखड्यातील इतर महत्त्वाच्या कामांवरही प्रकाश टाकला. लेझर शो, लाईट शो, पार्किंगची सोय, तसेच आवश्यक भूसंपादनाची गतीमान प्रक्रिया. मतदारसंघातील घरांच्या अडचणी, वनविभागासह इतर विभागांच्या विलंबकारक प्रक्रियांचा प्रश्न आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रलंबित परवानग्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस निर्णय घेण्यात आले. ठराविक कालमर्यादेत सर्व परवानग्या मिळवून डिसेंबरपर्यंत प्रकल्पांच्या कामांना प्रत्यक्ष गती देण्याचा जयस्वालांचा निर्धार ठाम आहे.
रामटेकच्या पायाभूत विकासाबरोबरच औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे. रामटेक एमआयडीसीची अधिसूचना जाहीर झाली असून कन्हार व पारशिवनी येथील एमआयडीसी प्रकल्पांसाठीही कार्यवाही सुरू झाली आहे. तर नेहरू मैदान, राखी तलाव आणि गडमंदिर या प्राधान्य प्रकल्पांना विशेष वेग देण्यात येत आहे.
Devendra Fadnavis : सलीम-जावेदची स्क्रिप्ट बंद करा, लोकं आता ओळखतात
प्रगतीचा गजर
हिवाळी अधिवेशनात रामटेक तीर्थक्षेत्रासाठी महत्वाचे निर्णय व्हावेत यासाठी पावले आधीच उचलली जात आहेत. पर्यटन, श्रद्धा आणि उद्योग. या तिन्ही क्षेत्रांमध्ये संतुलित, वेगवान आणि शाश्वत विकास घडविण्यासाठी जयस्वालांचा रोडमॅप तयार आहे. रामटेकच्या गडावरून आता केवळ घंटानादच नव्हे, तर प्रगतीचा गजरही होणार आहे. आणि हा गजर, आशिष जयस्वाल यांच्या निर्धाराचा, एका नव्या, उन्नत रामटेकचा आरंभ ठरणार आहे.
रामटेकच्या विकास प्रवासात स्थानिक नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असल्याचे जयस्वाल यांनी अधोरेखित केले. ही केवळ शासनाची योजना नाही, तर जनतेच्या आशा-अपेक्षांची पूर्तता आहे. प्रत्येक नागरिकाचा सहभाग, सूचना आणि सहकार्य मिळाल्यास, रामटेकचा विकास केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात दिसून येईल, असे ते म्हणाले.
त्यांच्या या घोषणेमुळे रामटेकच्या व्यापाऱ्यांपासून ते भाविकांपर्यंत सर्वांमध्ये नव्या उत्साहाची लहर आहे. स्थानिक तरुणाईला रोजगाराच्या नव्या संधी, पर्यटनातून वाढणारे उत्पन्न, आणि धार्मिक स्थळांचे जतन, या सर्व गोष्टी एकत्र येऊन रामटेकला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळा ठसा उमटवून देतील, असा विश्वास जयस्वालांनी व्यक्त केला. आता प्रश्न फक्त एवढाच आहे की, या नव्या पहाटेचा प्रकाश किती वेगाने गडाच्या शिखरावरून संपूर्ण परिसरात पसरतो.