राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. मात्र महायुती सरकार अजूनही निष्क्रिय आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची आणि दसऱ्यापूर्वी नुकसानभरपाई जमा करण्याची ठाम मागणी केली आहे.
राज्यातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाला आहे. खरीप हंगाम पूर्णपणे नष्ट झाला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे असतानाही महायुती सरकार मात्र या संकटाकडे डोळेझाक करत आहे. दसरा आणि दिवाळी सारखे सण जवळ येत असताना शेतकऱ्यांच्या हातात मदतीचा एकही पैसा पडलेला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारच्या या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दसऱ्यापूर्वी हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई जमा करण्याची मागणी केली आहे. सरकारकडे शेतकऱ्यांसाठी निधी नाही, पण इतर गोष्टींसाठी पैशाची कमतरता भासत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना सपकाळ यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास दिला. पैठण तालुक्यातील मुरमा, कोळीभोडखा आणि जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मसई येथे त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, जालना जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र राख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले असताना सरकार मात्र केवळ आकडेवारी सादर करत आहे. ठोस उपाययोजना करत नाही, अशी खंत सपकाळ यांनी व्यक्त केली.
सरकारची निष्क्रियता
राज्यातील परिस्थिती अतिवृष्टीमुळे अत्यंत विदारक बनली आहे. शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली. जमिनी खरडल्या गेल्या आणि जीवनाची साधने नष्ट झाली. अशा परिस्थितीत प्रशासनाचा एकही अधिकारी नुकसान पाहणीसाठी गावागावात फिरला नाही. सरकारच्या नेत्यांचे वक्तव्ये शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहेत. शेतकरी मदतीसाठी हात पसरत असताना सरकारकडून ‘पैसे कुठून आणू?’ अशी विचारणा केली जाते. जणू शेतकऱ्यांवर उपकार केले जात आहेत. सपकाळ यांनी सरकारच्या या असंवेदनशील वृत्तीवर कठोर टीका केली. ते म्हणाले, शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्यांचा आक्रोश ऐकण्याची संवेदनशीलता सरकारमध्ये नाही. ही लाजिरवाणी बाब आहे.
सपकाळ यांनी केंद्र सरकारकडे विशेष पॅकेजची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकारकडे आमदार फोडण्यासाठी आणि शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध आहे. मग शेतकऱ्यांसाठी का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांचे आश्वासन म्हणजे ‘लबाडाचे आमंत्रण’ आहे. जे प्रत्यक्षात कृतीत उतरत नाही. शेतकऱ्यांच्या हातात ठोस मदत पडण्याची गरज आहे. केवळ फोटोसाठी बांधावर येणे पुरेसे नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या दुखण्याकडे गांभीर्याने पाहावे आणि दसऱ्यापूर्वी नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सपकाळ यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.
काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या या संकटकाळात त्यांना आधार देण्याचे वचन दिले आहे. सपकाळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना धीर दिला. पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. सरकारची अहंकारी भाषा आणि निष्क्रियता शेतकऱ्यांच्या तळमळीला तुच्छ लेखणारी आहे. अशा वेळी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत राहील, असे सपकाळ यांनी ठामपणे सांगितले. शेतकऱ्यांच्या या लढ्यात काँग्रेस त्यांचा आवाज बनून सरकारला जाब विचारण्यास तयार आहे.
