महाराष्ट्र

नागपूर Chandrashekhar Bawankule, भंडारा जाणार NCP कोट्यात

पालकमंत्री ठरविण्यासाठी Mahayuti सरकारची संभाव्य यादी

Share:

Author

कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन बरेच दिवस झाले आहेत. त्यानंतर जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरलेले नाहीत. नवीन वर्षात पालकमंत्री ठरण्याची शक्यता आहे.

महायुती सरकार सत्तेवर येऊन बरेच दिवस झाले आहेत. अद्यापही अनेक मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. आता काही टप्प्यात मंत्री पदभार स्वीकारत आहे. मात्र अद्यापही पालकमंत्री पदाबाबत नाव निश्चित झालेली नाहीत. त्यामुळं कोणत्याही जिल्ह्याला कोण पालकमंत्री मिळणार, हे अद्यापही अनिश्चित आहे. याच महिन्यात प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होणार आहे. त्यापूर्वी पालकमंत्री निश्चित करणे सरकारला गरजेचे राहणार आहे. नागपूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद महसल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळेल असं निश्चित मानलं जात आहे. गडचिरोलीचं पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं असेल असंच दिसत आहे.

पुण्याचं पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राहिल यात दुमत नाही. ठाण्याचं पालकत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं राहणार आहे. महायुतीच्या सरकारमध्ये संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. त्यानुसार विदर्भातील अनेक जिल्ह्यांना कोण पालकमंत्री मिळू शकेल, याबाबत जवळपास स्पष्टता दिसत आहे. अधिकृत घोषणा तेवढी शिल्लक राहिली आहे. विदर्भातील अकोल्याचं पालकत्व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडं राहण्याची दाट शक्यता आहे. अकोला भाजपची देखील हिच मागणी आहे. चंद्रपूरचे पाकलमंत्री नरहरी झिरवळ हे असू शकतात.

राज्याला ‘समृद्धी’; Nagpur To Mumbai आठ तासात प्रवास

पुन्हा Imported मंत्री

काही जिल्ह्यांना पुन्हा इम्पोर्टेड पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे. यवतमाळच्या पालकमंत्री पदासाठी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे जोर लावत आहेत. मात्र हा जिल्हा भाजपला हवा आहे. मदन येरावार किंवा इंद्रनील नाईक यांचीही या जिल्ह्यासाठी इच्छा आहे. अमरावतीचे पालकमंत्री यापूर्वी चंद्रकांत पाटील होते. त्यांच्याकडं ही जबाबदारी पुन्हा येऊ शकते असं सांगण्यात येत आहे. भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदाबाबत अद्याप नाव निश्चित झालेलं नाही. हा जिल्हा भाजपकडं राहावा असं माजी मंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांचा प्रयत्न राहणार आहे. बुलढाण्याची जबाबदारीही अकोल्यासोबत फुंडकर यांच्याकडे राहू शकते.

गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचं कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा हा जिल्हा आहे. त्यामुळं येथे अदिती तटकरे या पाकलमंत्री असाव्या असा प्रयत्न पटेल यांचा राहणार आहे. वर्धा जिल्ह्यात डॉ. पंकज भोयर यांच्याशिवाय दुसरं नाव सध्यातरी दिसत नाही. वाशिम जिल्ह्यासाठी संजय राठोड आणि इंद्रनील नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. या भागात बंजारा लोकवस्ती सर्वाधिक आहे. त्यामुळं यवतमाळ भाजप आपल्याकडं ठेऊ शकते. त्या मोबदल्यात वाशिम जिल्हा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ शकते. दत्तात्रय भरणे यांचं नावही वाशिमसाठी चर्चेत आहे.

Corporation Election लक्ष

लवकरच राज्यात महापालिका निवडणूक होणार आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेवर सत्ता काबिज करण्यासाठी भाजप आणि शिवसेना बरेच प्रयत्न करीत आहे. त्यामुळं मुंबईत दमदार पालकमंत्री नेण्यात येणार आहे. ठाणे शिंदे यांचा गड आहे. तो त्यांच्याकडंच राहिल असं दिसत आहे. नाशिकमधून छगन भुजबळ यांना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळं येथे त्यांच्या तोडीचा पालकमंत्री द्यावा लागणार आहे. जळगावमध्ये गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात स्पर्धा आहे. यंदा अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील यांना हवं आहे. बीड जिल्ह्यातील हत्याप्रकरण राज्यभर गाजत आहे. त्यामुळं येथे धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. विदर्भातील राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना कोणता जिल्हा दिला जाणार हे देखील अनिश्चित आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!