
महाशिवरात्रीच्या यात्रेला अवघे काही दिवस उरले असताना पहेला ते आंभोरा सात किलोमीटर रस्त्याचे काम वर्षभरापासून अपूर्ण आहे.
महाशिवरात्री अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना चैतन्यश्वर महादेवाच्या यात्रेची तयारी जोमात सुरू आहे. परंतु, यात्रेच्या नियोजनात महत्त्वाचा मुद्दा असलेल्या रस्त्याच्या स्थितीची दयनीय अवस्था काही केल्या संपत नाही. मागील वर्षी जसे भाविकांनी खडतर प्रवास सहन केला, तसेच यंदाही वाट पाहावी लागणार आहे.
वैनगंगा नदीवरील रोप वे सुरु झाल्यामुळे नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परंतु, पहेला ते आंभोरा या अवघ्या सात किलोमीटरच्या रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले आहे. सरकारी अनास्थेमुळे हे बांधकाम आजही अपूर्णच आहे. विशेषतः महाशिवरात्रीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर, ज्या वेळी लाखोंचे जनसागर या ठिकाणी लोटणार आहे, त्या वेळी या रस्त्याची हीच अवस्था असेल, हे आश्चर्यकारक आणि संतापजनक आहे.

गाफील प्रशासन
दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो शिवभक्त आंभोरा येथे चैतन्यश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येतात. निसर्गरम्य आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या या ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडणे ही नित्याची बाब झाली आहे. मागील वर्षी ग्रामपंचायत मौदी पुनर्वसनच्या सरपंचांनी प्रयत्न करून पार्किंग व्यवस्थेचा काहीसा प्रश्न सोडवला होता. मात्र, आता सरपंच पदाचा कार्यकाळ संपला असून, प्रशासनाने प्रशासक नेमला आहे. पण या प्रशासकाने या समस्येकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे.
महाशिवरात्रीला गर्दी किती प्रमाणात वाढेल, याचा विचार प्रशासनाने वेळीच करायला हवा होता. मागील वर्षी 26 जानेवारीला झालेल्या गर्दीमुळे या मार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली होती. आता यात्रेच्या वेळी हेच संकट उग्र स्वरूप धारण करणार, यात शंका नाही. प्रश्न हा आहे की, भाविकांनी दरवर्षी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा त्रास का सहन करावा?
शून्य विकास
चैतन्यश्वर महादेवाचे हे पवित्र स्थळ वैनगंगा, आंब, कन्हान, मुर्जा आणि कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. अशा प्राचीन आणि महत्त्वाच्या धार्मिक स्थळाचा विकास प्राधान्याने व्हायला हवा. मात्र प्रत्यक्षात येथे काहीही सुविधा नाहीत. देवस्थानाकडे जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची स्थिती बघितली, तर सरकारच्या विकासाच्या गप्पा फोल ठरतात.
यात्रेसाठी लाखो श्रद्धाळू येथे येणार आहेत. परंतु, त्यांच्या वाहनांसाठी रस्ते अपुरे, पार्किंगसाठी व्यवस्था नाही, सुरक्षा आणि स्वच्छतेच्या बाबतीत काहीही नियोजन नाही. आध्यात्मिक पर्यटन वाढवण्याच्या नावाखाली कोट्यवधींच्या योजना जाहीर होतात, पण प्रत्यक्षात भाविक आणि पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरते.
महाशिवरात्रीला ‘महाअडचण’
महाशिवरात्री म्हणजे केवळ आध्यात्मिक सोहळा नाही, तर संपूर्ण परिसराच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा मोठा सण आहे. हजारो दुकाने, फेरीवाले, स्थानिक व्यवसायिक या यात्रेवर अवलंबून असतात. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ना रस्त्यांची सुविधा आहे, ना पार्किंगची सोय.
पार्किंगच्या नावाखाली भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जातात. परंतु त्या मोबदल्यात काहीही सुविधा मिळत नाहीत. महाशिवरात्रीच्या काळात भाविकांचे हाल कमी करण्याऐवजी प्रशासन त्यांच्या भावनांशी खेळत आहे.