
प्रशांत कोरटकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. याच्या निषेधार्थ अमरावतीत शिवसन्मान महामोर्चा काढण्यात आला, ज्यामध्ये हजारो शिवप्रेमींनी सहभाग घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावण्याचा नवा प्रयत्न झाला आहे. प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या परिवाराविषयी अपमानास्पद भाषा वापरल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ अमरावती शहरात ‘शिवसन्मान महामोर्चा’ काढण्यात आला. कोरटकरच्या या विधानांमुळे मराठा समाज आणि इतर बहुजन समाज संतप्त झाला असून, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. राज्यातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना माफ करणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे, तर त्याने चर्चा करताना राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत अपमानास्पद भाषेत उल्लेख केला आहे. महाराष्ट्रात सातत्याने काही विशिष्ट प्रवृत्ती महापुरुषांचा अपमान करून खोटा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप या आंदोलनाच्या आयोजकांनी केला आहे.

Maharashtra Budget Session : दादांच्या पक्षाचा चेहरा उपाध्यक्षपदावर
देशद्रोहाचा गुन्हा
विशेष म्हणजे, कोरटकरच्या या वादग्रस्त वक्तव्यावर अजूनही सरकारने ठोस कारवाई केली नाही. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि तातडीने अटक करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. पण सरकार त्याला अभय देत आहे का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
अमरावती शहरात पंचवटी चौक येथील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकाला अभिवादन करून मोर्चा काढण्यात आला. अनेक नागरिक शिवभक्तप्रेमी या मोर्चात सहभागी होणार आहेत.या मोर्चाला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील पाठिंबा दिला आहे. “शिवाजी महाराज आणि जिजाऊंवर टीका करणाऱ्यांना महाराष्ट्रात माफ करणार नाही,” असे बच्चू कडू यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे हा मोर्चा सरकारवर दबाव टाकणारा ठरणार आहे.
अमरावतीकर संतापले
मोर्चा आयोजकांचा आरोप आहे की, सरकार कोरटकरचा ठावठिकाणा माहित असूनही त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई करत नाही. उलट, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना पोलिस सुरक्षा देण्याऐवजी कोरटकरच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवली जात आहे. हा प्रकार सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
यापूर्वीही राज्यात अनेकदा महापुरुषांचा अपमान करून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. कोरटकरसारख्या प्रवृत्तींना जर वेळीच धडा शिकवला नाही, तर भविष्यात अजून गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र पेटणार
अमरावतीत झालेल्या या मोर्चामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा इतिहासाचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात एकजूट दिसून येत आहे. हा मोर्चा केवळ निषेध नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचे संरक्षण करण्यासाठी लढा आहे, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.