
राज्यपालांच्या अधिवेशनावर मत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही टोमणे मारले.
मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. विकास कामांना स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही, असा थेट हल्ला चढवत त्यांनी महाविकास आघाडीला बरेच टोमणे मारले. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या काही निर्णयांना स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावरून झालेल्या आरोपांना फडणवीस यांनी चोखपणे प्रत्युत्तर दिले. विधानसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे आता काहीच चालत नाही अशी टीका केली होती.
अलीकडच्या काळामध्ये महायुतीच्या सरकारने एकनाथ शिंदे यांचे काही निर्णय फिरवले. त्यावरून प्रसारमाध्यमांमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदे यांना दणका अशा आशयाच्या बातम्या येत होत्या. या सर्वांचे तोंड देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या भाषणातून बंद केले. महायुती सरकार मधील सर्व निर्णय आपण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या समन्वयाने घेत आहोत. मनमानी करायला आणि विकास कामांना स्थिती द्यायला आपण उद्धव ठाकरे नाही, असे फडणवीस यांनी आक्रमकपणे नमूद केले. त्यामुळे विरोधी बाकांवर बसलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली.

Maharashtra Council session : विरोधकांचा आक्रमक पवित्रा, सत्र पुन्हा पुन्हा तहकूब
सामूहिक जबाबदारी
यापूर्वीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी आपण उपमुख्यमंत्री होतो. अजित पवारही सोबत होते. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाची जबाबदारी झटकणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकार चालवताना काही निर्णय बदलावे लागतात. काही त्रुटी दूर कराव्या लागतात. या सर्व त्रुटी दूर करताना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पूर्ण विश्वासात घेतले जात आहे. महायुतीचे सरकार हे समन्वयाने चालणारे सरकार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नमूद केले.
धान खरेदी, मराठवाड्यातील पाणीटंचाई आदी मुद्द्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या अवमानाच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील विकास वेगाने होत आहे. सरकारवर टीका करण्यासाठी विरोधकांना काहीही सापडत नाही. त्यामुळे मनाला येईल त्या कपोलकल्पित कथा विरोधी पक्षाकडून रचल्या जात असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. भविष्यात विकासकामांमुळे महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदललेला असेल असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.