
उद्धव ठाकरे यांनी थेट RSS आणि भाजपवर घणाघात केला आहे. गच्चीतून देशप्रेम शिकवणारे आज देशाच्या सूत्रांवर आहेत,” असा घणाघाती आरोप करत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिकाच सुरू असते. राजकीय पटलावर वादाची एक ठिणगी पडली की, त्यावर सडेतोड उत्तर देण्याची परंपराच महाराष्ट्रात रुजली आहे. अशाच एका जळजळीत टीकेत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उपराजधानीत आयोजित एका शिबिरात बोलताना उद्धव ठाकरे यांनी संघ परिवारावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकेचे बाण सोडले. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काडीचाही संबंध नाही, अशा लोकांच्या हातात आज देशाची सूत्रे आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी RSS आणि भाजपवर टीका करताना म्हटले की, ‘हे लोक गच्चीत काठ्या घेऊन फिरतात आणि देशप्रेम शिकवतात. त्या काठ्या कपडे वाळत घालण्यासाठी ठीक आहेत, पण देशप्रेमासाठी नाही.’ ते पुढे म्हणाले, ‘जे स्वातंत्र्य लढ्यात नव्हते, त्यांनी आता देशावर मालकी सांगायची पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू झालं तर हे गच्चीतून घोषणा देतात, पण प्रत्यक्ष लढायला कुठे जातात.’ संघाच्या भूमिकेवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जसं यांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध नव्हता, तसाच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशीही नव्हता. जेव्हा महाराष्ट्र एकसंध करण्याचा प्रश्न होता, तेव्हा हे कोठे होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या अर्थशास्त्राचे चाणक्य नवा अध्याय लिहायला सज्ज
भाजपमुक्त राम हवा
देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात ‘काम थांबवायला उद्धव ठाकरे आहे का?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘फडणवीस कधीच उद्धव ठाकरे होऊ शकत नाहीत. कारण आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो, तर हे मालकाच्या मित्रांचे खिसे भरण्यासाठी.’ राम मंदिराच्या मुद्यावरही उद्धव ठाकरेंनी भाजपला आव्हान दिले. आम्हीही जय श्रीराम म्हणतो, पण रामावर तुमचा काय अधिकार? आम्हाला भाजपमुक्त राम हवा. तसेच, तुम्ही फक्त श्रीरामचा जयघोष कराल, पण शिवरायांचा नाही? भाजपवाल्यांनी जय शिवाजी, जय भवानी म्हणायला हवे.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावरही त्यांनी खोचक टीका केली. आम्हीही मोहन भागवतांचे अनुयायी आहोत. तेच कुंभमेळ्यात गेले नाहीत, तर आम्ही कसे जाणार? असा उपरोधिक टोला ठाकरे यांनी लगावला. छावा चित्रपटाच्या निमित्तानेही त्यांनी भाजपवर ताशेरे ओढले. या चित्रपटात भाजपवाल्यांचा कर्तृत्व काय? त्याचा आणि तुमचा काय संबंध? आणाजी पंताने भगव्या झेंड्यावर डाग लावल्याचे पाहायचे असेल, तर नक्की जा, असेही त्यांनी उपहासात्मकपणे सांगितले.