महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : राज ठाकरेंच्या टीकेला अल्पमताचा शिक्का

Maharashtra Politics : गंगाजल मुद्द्यावर भाजप नेते आक्रमक

Author

माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंच्या गंगाजलविषयक वक्तव्यावर मिश्किल टोला लगावत, राज ठाकरे अल्पमतात आहेत असे सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या गजबजाटासोबतच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विधानांचीही जोरदार चर्चा रंगली आहे. उत्तर प्रदेशातील महाकुंभावर त्यांनी केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. ठाकरे यांच्या विधानांवर भाजपच्या बड्या नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहे. सध्यातरी हा विषय चांगलाच गाजत आहे.

गंगा नदीतील पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचे मत व्यक्त करत, राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील स्नानावर टीका केली होती. भाजपचे मंत्री आणि नेते यावर आक्रमक झाले आहेत. मत्स्यपालन मंत्री नितेश राणे यांनी “मला तर कुठली खाज आली नाही” अशा शब्दांत राज ठाकरेंना सुनावलं. तसेच, भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही ठाकरेंच्या भूमिकेवर जोरदार प्रहार केला आहे.

Gadchiroli : रेशीम बाजारपेठ ओपनिंगला रेडी

मुनगंटीवारांचे प्रतिउत्तर 

सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरेंवर टीका करताना त्यांची भूमिका अल्पमतातील असल्याचा दावा केला. राज ठाकरे यांनी जी टीका केली, ती देशातील जनतेला मान्य नाही. उत्तर प्रदेश सरकारने कुंभमेळ्यातील 65 कोटी स्नानार्थींचा आकडा जाहीर केला आहे. त्यामुळे गंगाजलावर अशा प्रकारची टीका करणं योग्य नाही. असे ते म्हणाले.

मुनगंटीवार यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांचाही उल्लेख केला आणि तेही ठाकरेंच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं सांगितलं. नांदगावकर साहेबही राज ठाकरे यांचं ऐकत नाहीत असं दिसतंय अशी मिश्किल टीका करत त्यांनी मनसेतील मतभेद दाखवण्याचा प्रयत्न केला.

गंगा स्वच्छतेचा प्रश्न  

गंगा शुद्धीकरणाची चर्चा नवीन नाही. 1985 मध्ये राजीव गांधींनी गंगा स्वच्छ करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक योजना आल्या, पण गंगा तशीच राहिली. राज कपूर यांनी ‘राम तेरी गंगा मैली’ काढली, तेव्हा लोकांना वाटले, गंगा खरंच स्वच्छ झाली. पण तो एक चित्रपट होता, असा टोला ठाकरे यांनी लगावला होता.

गंगेच्या स्वच्छतेबाबत वारंवार चर्चा होते, मात्र प्रत्यक्षात नद्यांमध्ये प्रदूषण वाढतच चालले आहे. अशा परिस्थितीत, राज ठाकरे यांची टीका आणि त्यावरून पेटलेला वाद राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की, या विधानांमुळे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणावर काय परिणाम होतो.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!