
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत, यंदाचा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरेल असे मत व्यक्त केले.
राज्याच्या आर्थिक राजधानीत 10 मार्च रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. या संकल्पाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी स्वागत केले, तर काहींनी टीका केली. मात्र, त्याची फलश्रुती भविष्यातच स्पष्ट होईल. शेतकरी, उद्योजक आणि महिलांसह सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा मानला जातो. सरकारच्या मोठ्या योजनांच्या अंमलबजावणीवरच राज्याच्या प्रगतीचे भवितव्य अवलंबून असेल.
यंदाचा अर्थसंकल्प राज्याच्या आर्थिक विकासाचे प्रतिबिंब दर्शवतो. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार, राज्याच्या शाश्वत विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा अधिकाधिक फायदा कसा मिळेल, यावर भर देण्यात आला आहे. बावनकुळे म्हणाले की, हा समाजातील प्रत्येक घटकाला समतोल साधून संधी उपलब्ध करून देणारा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची आर्थिक प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Anil Deshmukh : लोकांना खोट्या आश्वासनांची सुवर्णतोंडी मिठाई
सरकारच्या मोठ्या घोषणा
शिक्षण, कृषी, उद्योग, जलसंधारण, जलपर्यटन, रेल्वे आणि महामार्ग यांसारख्या क्षेत्रांत गुंतवणूक वाढवण्यात आली आहे. राज्याच्या विकासचक्राला या निर्णयांमुळे गती मिळणार आहे. विशेषत: शाश्वत ऊर्जा आणि नागरी सुविधांसाठी सरकारने मोठ्या योजनांची घोषणा केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांना ‘मुख्यमंत्री बळीराजा’ योजनेतून मोफत वीज पुरवली जाणार आहे. सोबतच 27 जिल्ह्यांमध्ये दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ‘पंतप्रधान सूर्यघर’ योजनेसाठी देखील भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे.
Congress : अर्थसंकल्प झाले सादर अन् विरोधकांनी टाकली टीकेची चादर
इतिहास जपणारा निर्णय
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक आग्र्यात उभारले जाणार आहे. याशिवाय, कोकणातील संगमेश्वर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अभिमान अधिक दृढ होण्याचे महसूल मंत्र्यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तब्बल 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नवीन गृहनिर्माण धोरणामुळे गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना घर मिळवणे अधिक सुलभ होईल. यामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागात गृहसंपत्तीच्या वाढीला गती मिळण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पावर संमिश्र प्रतिक्रिया
यंदाच्या अर्थसंकल्पाविषयी विरोधी पक्षांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी यातील तरतुदींचे स्वागत केले, तर काहींनी त्यास ताशेरे ओढले. अर्थसंकल्प जनतेसाठी उपयुक्त आहे की केवळ घोषणांचा पाऊस आहे, हे काळच ठरवेल. मात्र, राज्याच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी प्रभावी झाली, तर महाराष्ट्राचा आर्थिक प्रवास अधिक सशक्त होईल.