
नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून उसळलेल्या तणावामुळे शहरात हिंसक संघर्ष झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपूरच्या नेत्यांसोबत तातडीची बैठक घेतली आहे.
महाराष्ट्राच्या उपराजधानी नागपूरमध्ये सध्या उसळलेली दंगल थांबली आहे आणि आता धर पकड सुरू झाली आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेला वाद आता चांगलाच चिघळला आहे. नागपुरात दोन गट आमनेसामने आले आहेत. आंदोलनाच्या नावाखाली शहरात अराजकता माजल्याचे दिसत आहे. हिंदू आणि मुस्लिम गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसर अशांततेच्या विळख्यात सापडला आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा गाजतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मोठे आंदोलन करण्यात आले. विश्व हिंदू परिषद आणि काही अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी या मुद्द्यावर तीव्र विरोध दर्शवत आंदोलन छेडले होते. मात्र, सायंकाळी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आणि परिस्थिती पूर्णतः बिघडली.

Maharashtra : नागपुरातील दंगलीत पोलीस उपायुक्तांवर कुऱ्हाडीने हल्ला
कडक कारवाईचे आदेश
हिंसाचारानंतर राज्य सरकार आणि प्रशासन तातडीच्या हालचाली करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तातडीची बैठक घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना संपूर्ण अधिकार देत समाजकंटकांना तात्काळ शोधून कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
संध्याकाळी परिस्थिती अधिकच नियंत्रणाबाहेर गेली. दोन्ही गटांनी रस्त्यावर उतरून एकमेकांविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. लवकरच आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आणि दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण संतप्त जमावाने थेट पोलिसांवरच हल्ला केला.
संपूर्ण प्रकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कार्यालयानेही सतत पोलिस प्रशासनाशी संपर्क ठेवत असल्याची माहिती दिली आहे.
भीतीचे वातावरण
संपूर्ण घटनेमुळे नागपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. शहरात भीतीचे वातावरण कायम आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे. औरंगजेबाच्या कबरीचा हा वाद मात्र पुढे कुठे जाऊन थांबतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. नागपूरमध्ये उसळलेला हिंसाचार हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी धोक्याचा इशारा आहे. सरकारने यावर कठोर पावले उचलली नाहीत, तर हा वाद आणखी वाढू शकतो. त्यामुळे नागपूरच्या वातावरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.