महाराष्ट्र

Abu Azmi : शांततेच्या नगरीला दंगलीचा ग्रहण

Nagpur : मुख्यमंत्र्यांचा कटाचा आरोप, तर आझमींचे संयमाचे आवाहन

Author

नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीने सामाजिक सलोख्याला तडा गेला. अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर गंभीर आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले.

नागपूरच्या शांततेला तडा गेला आहे. औरंगजेबाच्या कबर-उखडण्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्च्यानंतर शहरात दोन गटांत हिंसाचार उसळला. या दंगलीत अनेक पोलीस आणि सामान्य नागरिक जखमी झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेला सुनियोजित कट म्हटले, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात कठोर कारवाईचे संकेत दिले.

दंगलीच्या या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. एका बाजूला शांततेचे आवाहन, तर दुसऱ्या बाजूला प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात आले.

गंगा-जमुनी संस्कृती धोक्यात

आमदार अबू आझमी, जे नुकतेच विधानसभेच्या अधिवेशनातून निलंबित झाले होते, त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत “नागपूरमध्ये यापूर्वी कधीही सांप्रदायिक तणाव नव्हता, मात्र आता शहर अशांततेच्या आगीत होरपळत आहे.” असे म्हणत दु:ख व्यक्त केले. त्यांनी रमजानच्या पवित्र महिन्यात सर्वांनी संयम राखावा आणि कुठल्याही चिथावणीला बळी पडू नये, असे आवाहन केले. मात्र याच वेळी त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य करत, हा तणाव कोण पसरवत आहे आणि कुणाच्या आदेशावर काम सुरू आहे, याचा शोध घेतला पाहिजे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली.

Nagpur Zilla Parishad : तंत्रज्ञानाच्या दिशेने दमदार पाऊल

अबू आझमी यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत औरंगजेब हा उत्तम शासक होता असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आणि त्यांना अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला, असे त्यांचे म्हणणे होते. या पार्श्वभूमीवर आता नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीमुळे त्यांचे विधान पुन्हा चर्चेत आले आहे. काहींनी या संपूर्ण घटनेला “नियोजनबद्ध राजकीय खेळी” म्हटले, तर काहींनी यातून मोठा धार्मिक संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

ओवेसी यांचा आरोप

दंगलीनंतर एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी थेट महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल केला. राज्याचे काही मंत्रीच चिथावणीखोर विधाने करून हिंसाचार भडकवत आहेत. सत्तेत बसलेल्यांची जबाबदारी शांतता राखण्याची असते, पण तेच समाजात तेढ निर्माण करत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. एका मुघल शासकाची प्रतिमा संपूर्ण राज्यात जाळली गेली, पण काही घडले नाही. मात्र, नागपूरमध्ये कुराणातील मजकूर लिहिलेले कापड जाळले गेले, त्यानंतरच परिस्थिती बिघडली, असा दावा करत त्यांनी प्रशासनाची भूमिका आक्षेपार्ह असल्याचे सांगितले.मुस्लीम बांधवांनी शांततेने पोलीस ठाण्यात तक्रार केली, पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. परिणामी, दंगल उसळली. ही घटनांची साखळी तपासल्याशिवाय सत्य समजणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दंगल राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भडकली की यामागे कोणते तरी मोठे कटकारस्थान आहे, याचा तपास सुरू आहे. मात्र, राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या खेळात सामान्य नागरिक भरडले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. परंतु, अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांचे आरोप सरकारला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडतील, असे दिसते.

घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. एकीकडे राजकीय पक्षांनी शांततेचे आवाहन केले असले, तरी दुसरीकडे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.जर सरकारने योग्य ती पावले उचलली नाहीत, तर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. नागपूरच्या नागरिकांनी संयम राखला नाही, तर शहर आणखी मोठ्या सामाजिक संघर्षात सापडू शकते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!