
भाजपच्या ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानाचा जोर विदर्भात अनुभवायला मिळाला. नागपूरात झालेल्या भव्य कार्यशाळेत कार्यकर्त्यांनी संघटन शक्तीचा नवा निर्धार केला.
भारतीय जनता पक्ष देशभरात ‘संगठन पर्व’ साजरा करत आहे. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी सुरू असलेल्या या पर्वाचा महत्त्वपूर्ण टप्पा उपराजधानी नागपुरात साक्षीदार ठरला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 3 जुन मंगळवारी नागपुरातील साउथ अंबाझरी रोडवरील मुंडले सभागृहात भाजपा विदर्भ स्तरीय कार्यकर्ता कार्यशाळेचे भव्य आयोजन करण्यात आले. पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत विदर्भातील सर्व नव्याने नियुक्त जिल्हा व मंडळ अध्यक्षांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यशाळेद्वारे पक्षाने ‘संकल्प ते सिद्धी’ या अभियानाचा नवा ध्यास घेत कार्यकर्त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचे घराघरात प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले. चव्हाण यांनी आपल्या प्रभावी भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह व जोम निर्माण केला.

संघटनात्मक जिल्ह्यांचा सहभाग
कार्यशाळेत पूर्व आणि पश्चिम विदर्भातील 19 संघटनात्मक जिल्ह्यांमधील जिल्हाध्यक्ष आणि मंडळ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 11 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘संकल्प ते सिद्धी’ या संदेशाचा जागर यावेळी करण्यात आला.
रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, पक्ष हा केवळ निवडणूक मशीन नसून एक वैचारिक चळवळ आहे. कार्यकर्त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत जनतेपर्यंत सरकारच्या यशस्वी योजनांचा मागोवा पोहोचवावा. ही कार्यशाळा केवळ माहिती देणारी नव्हे, तर भविष्यातील विजयी रणनिती ठरवणारी ठरेल.
Nagpur : ऑपरेशन थंडरने उघडकीस आणले मुंबई-भंडारा ड्रग्ज नेटवर्क
विशेष अभियान
या कार्यशाळेदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाच्या (5 जून) निमित्ताने ‘एक वृक्ष मातृभूमीसाठी’ हे विशेष अभियान सुरू करण्यात येणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत नागरिकांनी किमान एक वृक्ष लावण्याचा आणि त्याचे जतन करण्याचा संकल्प करावा, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून, भाजप कार्यकर्ते समाजाला दिशादर्शक ठरतील, असे ते म्हणाले.
याशिवाय 25 जून 1975 रोजी लादण्यात आलेल्या आणीबाणीस स्मरून देशभरात जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर असलेला विश्वास कायम राहावा, हा त्यामागील हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच, 21 जून रोजी होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मंडळात कमीत कमी दोन आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. योग, आरोग्य व जीवनशैली याबद्दल जागरूकता वाढवणे ही भाजपची सामाजिक बांधिलकी असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांचा निर्धार
या संपूर्ण कार्यशाळेत उत्साह, ऊर्जा आणि आत्मभान यांचा संगम दिसून आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आगामी काळात संघटनेची पातळीवर नवे मापदंड उभारण्याचा निर्धार यावेळी केला. विदर्भातील प्रत्येक मंडळ, गाव आणि गल्लीपर्यंत कार्यकर्ते पोहोचतील, योजनांची माहिती देतील आणि मतदारांच्या मनात भाजपा म्हणजे विश्वासार्हता व विकास याची शिकवण रुजवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.