
नागपूर येथील शिक्षक भरती घोटाळ्याची झळ भंडाऱ्यातही पोहोचली आहे. एका अधिकाऱ्याच्या सहीअभावी जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे वेतन रखडले आहे.
भंडारा जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचे पगार रखडले आहेत. मार्च महिना संपत आला तरी अजूनही त्यांच्या खात्यात वेतन जमा झालेले नाही. नियमांनुसार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नियमित वेतन अदा करणे आवश्यक असते. मात्र, सध्या जिल्ह्यात जवळपास तीन हजारांहून अधिक शिक्षकांना त्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यामागचे कारण म्हणजे एका सहीच्या अभावामुळे वेतन बिल ट्रेझरीकडे सादर होऊ शकलेले नाही.
समस्या त्या वेळेस उभी राहिली आहे जेव्हा नागपूरमध्ये बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक भरतीचा मोठा घोटाळा उघडकीस आला. यामुळे शिक्षण उपसंचालकांना अटक झाली असून भंडाऱ्याचे शिक्षणाधिकारी कार्यालयातून गायब झाले आहेत. त्यामुळे शिक्षण खात्यात जबरदस्त खळबळ उडाली आहे. अधिकारीही आता सावध झाले आहेत. बहुतांश अधिकारी रजेवर गेले आहेत. कार्यालयात येण्याचे टाळत आहेत. परिणामी, शिक्षकांच्या पगारावर सही करणारा अधिकारीही उपलब्ध नाही.

Chandrashekhar Bawankule : नियमबाह्य काम करणाऱ्या वाळू डेपोंविरुद्ध कारवाई
आर्थिक भार
नागपूर विभागातील तब्बल 580 शिक्षक भरती प्रकरणात बनावट कागदपत्रे वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर शिक्षण उपसंचालक अटकेत गेल्याने विभागात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूतपूर्व शिक्षणाधिकाऱ्यांवर चौकशीचा ससेमिरा आहे. सध्या कार्यरत असलेले अधिकारीही नोट रिचेबल आहेत. हे सर्व होत असताना जिल्ह्यातील शिक्षक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. फेब्रुवारी महिन्यातील पगारातून मोठ्या प्रमाणावर आयकर कपात झाली आहे.
उर्वरित रक्कम अत्यल्प राहिली. घरखर्च, मुलांचे शिक्षण, औषधोपचार, गृहकर्ज, एल. आय. सी., आणि इतर कर्जाच्या हप्त्यांमुळे शिक्षकांवर आर्थिक भार वाढलेला आहे. मार्चसाठी आवश्यक निधी वेतन पथकाकडे उपलब्ध असूनही एकट्या सहीअभावी वेतन रखडले आहे. जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, सैनिकी शाळा, नगर परिषद हायस्कूल, अध्यापक विद्यालये, वर्गतुकड्या आणि इतर अनेक आस्थापनांतील शिक्षक सध्या पगाराविना आहेत.
ट्रेझरीमध्ये बिल सादर होण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्याची सही आवश्यक आहे. मात्र, अधिकारीच अनुपलब्ध असल्याने संपूर्ण प्रक्रिया थांबलेली आहे. शिक्षकांच्या संघटनांनी प्रशासनाकडे जोरदार मागणी केली आहे की, पगार देण्यास विलंब करू नये. सहीसाठी दुसरा अधिकारी नियुक्त करून ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. शिक्षकांचे म्हणणे आहे की, कुणीही सही करो, पण आमचे वेतन आमच्या बँक खात्यात तात्काळ जमा झाले पाहिजे.