
कोतवाल सेवा करत असताना मृत्यू अथवा गंभीर आजारामुळे नोकरी गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना शासनाने दिलासा दिला आहे. अनुकंपा तत्त्वावर वारसांना नोकरीची संधी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाने कोतवाल पदावर कार्यरत असताना मृत्यू झालेल्या किंवा गंभीर अपघात, आजारामुळे शासकीय सेवा करण्यास असमर्थ ठरलेल्या कोतवालांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशा दुर्दैवी घटनेनंतर संबंधित कुटुंब आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे लक्षात घेता, त्यांच्या तातडीच्या मदतीसाठी अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. या निर्णयामुळे अनेक गरजू कुटुंबांना आधार मिळणार आहे. त्यांचे जीवन अधिक सुसह्य होणार आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये यासंदर्भातील निर्णय अधिकृतरीत्या जाहीर केला होता. या निर्णयानुसार सरळसेवा भरतीतील 10 टक्के पदे आता केवळ कोतवालांच्या वारसदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यामुळे दिवंगत कोतवालांच्या कुटुंबीयांना शासकीय सेवेत प्रवेशाची नवी दारं खुली होणार आहेत.

Pravin Datke : पंतप्रधानांसारखा भाऊ मिळणं देशातील प्रत्येक भगिनीचं भाग्य
पात्र सदस्य
अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी पात्र व्यक्तींमध्ये दिवंगत किंवा वैद्यकीय दृष्ट्या सेवेस अयोग्य ठरलेला कोतवाल यांचा पती अथवा पत्नी, मुलगा, मुलगी पात्र राहील. कायदेशीर दत्तक घेतलेला मुलगा किंवा मुलगी, तसेच पूर्णपणे कोतवालावर अवलंबून असणारे परिवारातील सदस्य, भाऊ किंवा बहिणी यांचा समावेश आहे. पात्रतेचा अंतिम निर्णय मात्र केवळ कोतवालाच्या पती किंवा पत्नीच घेऊ शकतात. जर ते हयात नसतील, तर उर्वरित कुटुंबीयांनी एकत्र येऊन नियुक्तीसाठी कोणते नाव सुचवायचे याबाबत नामांकन करावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी संबंधित आस्थापना अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. अनुकंपा नियुक्तीची माहिती कोतवालाच्या कुटुंबीयांपर्यंत वेळेवर पोहोचवणे हे त्यांच्या कर्तव्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. जर कोतवालाचा वारसदार त्या वेळी अल्पवयीन असेल, तर तो सज्ञान झाल्यानंतर एका वर्षाच्या आत अर्ज करू शकतो. यासंबंधी लेखी सूचना कुटुंबीयांना देणे आवश्यक राहील.
दोषी आढळल्यास बडतर्फ
अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाल्यावर संबंधिताने दिवंगत कोतवालावर अवलंबून असलेल्या इतर कुटुंबीयांचा सांभाळ करण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. भविष्यात या प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन झाल्याचा ठोस पुराव्यानिशी आरोप झाला, तर चौकशीनंतर दोषी आढळल्यास संबंधिताला सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही शासनाने दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बाबींचा विचार करता, अनुकंपा तत्त्वावर केवळ कुटुंबातील एकच व्यक्ती नियुक्तीस पात्र असेल. कोतवालाचे दोन विवाह झाले असल्यास, नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या पत्नीचे संमतीपत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच, प्रतीक्षासूचीत नाव असलेल्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास, त्या ऐवजी कुटुंबातील इतर पात्र सदस्याला नियुक्तीची संधी दिली जाईल. मात्र, एकदा कुटुंबातील एखाद्या वारसाचे नाव प्रतीक्षासूचीत घेतल्यानंतर, त्या जागी दुसऱ्या वारसाचे नाव घेता येणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा निर्णय केवळ रोजगार उपलब्ध करून देणारा नाही, तर सामाजिक न्याय व संवेदनशील प्रशासनाचे प्रतीक ठरणारा आहे. कोतवाल ही गावपातळीवरील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यांचं योगदान शासनाच्या यंत्रणेला बळकटी देणारे असते. अशा परिस्थितीत कोतवालाच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना सन्मानपूर्वक आणि तत्काळ रोजगार देण्याचा निर्णय म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारी कृतीच म्हणावी लागेल.
Vijay Wadettiwar : सरकारचं पाऊल ठाम असेल, तर काँग्रेसचा पाठिंबा नक्की