
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, भारतीय लष्कर पाकिस्तानविरोधात कारवाईस सज्ज आहे. केंद्र सरकारने आता निर्णय घ्यावा.
पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत आहे. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, लष्कर कारवाईस तयार आहे, मात्र राजकीय नेतृत्व कच खात आहे. मुंबईतील हुतात्मा चौकात वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या निषेध आंदोलनात प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली. माध्यमांशी बोलताना त्यांनी पाकिस्तानविरोधात थेट मिलिटरी अॅक्शनची मागणी केली. ते म्हणाले, जर मी नरेंद्र मोदी यांच्या जागी असतो, तर मी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची युद्धनीती अवलंबली असती.
रशियाने गेल्या दोन वर्षांपासून युक्रेनमधील इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केले. जेव्हा युद्ध थांबेल, तेव्हा युक्रेन नाटोशी जोडले गेले तरी धोका उरणार नाही. हीच रशियाची योजना आहे, असं उदाहरण देत आंबेडकर म्हणाले, मीही तेच केले असते. ते पुढे म्हणाले की, लष्करातील अनेक अधिकारी कारवाईस उत्सुक आहेत. मात्र, लष्कर ही एक शिस्तबद्ध यंत्रणा असून, आदेशाची वाट पाहत आहे. राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे. यावेळी निर्णय घेऊन कारवाई झाली पाहिजे, असा ठाम सूर त्यांनी व्यक्त केला. माओवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करताना त्यांच्या धर्माची चौकशी केली, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

Devendra Fadnavis : एज्यु-सिटी पासून फिल्म सिटी पर्यंत महाराष्ट्र होणार अव्वल
इंटेलिजन्स फेल्युअरचा आरोप
प्रकाश आंबेडकरांनी गुप्तचर यंत्रणांच्या अपयशावरही बोट ठेवले. हे एक क्लियर इंटेलिजन्स फेल्युअर आहे. अजूनही हल्लेखोर सापडलेले नाहीत. बहुधा नियंत्रण रेषा पार करून परत गेले असावेत, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, केंद्र सरकारने आता थेट लष्कराला आदेश द्यावेत. जनतेला कारवाई हवी आहे. दरवेळी माघार नको. यावेळी अॅक्शन झालीच पाहिजे, असं ते ठामपणे म्हणाले. प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले की, जर युद्धाची वेळ आली, तर जनता त्याचा परिणाम सहन करायला तयार आहे. तिजोरी कमी पडली, तरी जनतेचं समर्थन आहे. आम्ही हुतात्मा चौकात आंदोलन करत आहोत.
आम्हाला सरकारमध्ये कचखाऊपणा जाणवतो. त्यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला सल्ला दिला की, अॅडवांटेज इंडिया ही संधी आहे. राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागेल. एवढं मोठं लष्कर असूनही आपण अपमानित आहोत, हे दुर्दैवी आहे. माओवादी हल्ल्यांमुळे काश्मीरमधील पर्यटन पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, आता केंद्र सरकारने सकारात्मक पावले उचलायला हवीत. प्रत्येक राज्याला पर्यटक पाठवण्याच्या सूचना द्या आणि त्यांना संरक्षण द्या. महाराष्ट्रासाठी त्यांनी एक आश्वासनही दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टुरिस्ट ग्रुप पाठवायचं ठरवलं, तर त्यांचं नेतृत्व मी स्वतः करीन, असे त्यांनी ठामपणे जाहीर केले.