ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. सध्या या कारवाईचे सर्वपक्षीय स्वागत होत आहे.
जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्यानंतर अख्खा देश शोकसागरात बुडाला होता. या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला आणि देशभरातून संतापाची लाट उसळली. सरकारवर कारवाईसाठी दबाव वाढत असतानाच भारताने आपल्या भूमिकेत ठोसपणा दाखवत अत्यंत निर्णायक पाऊल उचललं. 7 मे (बुधवारी) रात्री भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी तळांवर एकाचवेळी अचूक हवाई हल्ले केले.
ऑपरेशन सिंदूर या नावाने राबवण्यात आलेल्या या संयुक्त लष्करी कारवाईने संपूर्ण देशात जोशाचे वातावरण निर्माण केले आहे. देशभरात भारत माता की जय घोषणा ऐकायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईचे स्वागत सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांकडूनही होत आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी ऑपरेशन सिंदूरचं समर्थन करत सोशल मीडियावर भारत माता की जयचा नारा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारवर कठोर टीका केली होती.
सर्वपक्षीय ऐक्याचे दर्शन
ठाकूर यांनी निष्क्रीयतेचा आरोप केला होता. पण या निर्णायक कारवाईनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. हा राजकीय बदल देशात एक वेगळाच संकेत देतो. दहशतवादाच्या विरोधात सर्वपक्षीय एकता निर्माण होणं ही भारताच्या लोकशाहीची मोठी ताकद मानली जाते. जनतेनंही या ऐक्याचं स्वागत करत देशप्रेमाने भारलेल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.
हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानशी संबंधित विविध गोष्टींवर बंदी जाहीर केली आहे. यामध्ये पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवर बंदी, विमान सेवा थांबवणं आणि पाकिस्तानाशी संबंधित यूट्यूब चॅनेल्सवर कडक कारवाई यांचा समावेश आहे. सरकारने या पावलांमुळे देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती काटेकोर भूमिका घेतली असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, सरकारच्या या निर्णयावरही यशोमती ठाकूर यांनी दोन दिवसांपूर्वी टीकेची झोड उठवली होती.
Operation Sindoor : एअर स्ट्राईक करत सगळ्यांची तोंडं केली बंद
पाणी आणि यूट्यूबच बंद करायचं होतं तर 500 कोटींचं राफेल 1 हजार 500 कोटींना घेऊन काय निंबू मिरची बांधायला ठेवले आहे का? असा उपरोधिक सवाल करत त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. मात्र भारत सरकारकडून केलेल्या निर्णायक पावलाने आता विरोधकांना ट्रोलही करण्यात येत आहे. नेटिझन्सनी विरोधकांच्या भूमिकेतील विरोधाभासावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
