
महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळं राज्यभरात चिंता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या काकांना फोन केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांना फोन करीत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दादांच्या फोनमुळे राजकीय आणि कौटुंबिक संबंधांवर नव्या चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावली आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित कार्यक्रमात भाषण करताना वारंवार खोकल्याचा त्रास होतानाचे दृश्य उपस्थितांनी पाहिले. या अवस्थेतही पवारांनी कोल्हापूर दौऱ्याला हजेरी लावली. मात्र दौऱ्यानंतर त्यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झाला.
डॉक्टरांनी पवारांना त्वरित विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सध्या ते मुंबईत त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. त्यांचे पुढील सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीच्या बातमीने संपूर्ण राज्यात चिंता पसरली. मात्र या परिस्थितीत एका महत्त्वाच्या घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी काकांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

मतभेद बाजूला
अजित पवारांनी शरद पवारांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. तुम्हाला पूर्ण बरे वाटेपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहावे, अशी काकांना विनंती केली. राजकारण आणि कौटुंबिक ताणतणाव एकत्रित येतात. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीने हे दाखवून दिले आहे. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात मतभेद उघड झालेत. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर कुटुंबातील तणाव कमी होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. या परिस्थितीत शरद पवारांच्या आजारपणाच्या काळात अजित पवारांनी विचारपूस करून एका कुटुंबीयाची भूमिका निभावली. त्यामुळे आता पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुढील काही दिवसांतील शरद पवार यांचे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पवारांना खोकल्यामुळे बोलण्यात अडचण होत आहे. त्यामुळं डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वाद महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच चर्चेचा विषय आहे. मात्र अशा संवेदनशील क्षणी अजित पवारांनी काकांची विचारपूस करून सौहार्दाची नवी बाजू दाखवली आहे. ही घटना पवार कुटुंबासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक महत्त्वाचा वळणबिंदू ठरू शकते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील एकत्रितता पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते.