
अजित पवार यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर मुस्लीम समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वक्फ सुधारणा विधेयक चांगलंच गाजत आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तुफान हल्लाबोल केला आहे. सपकाळ यांनी आरोप केला की, सत्तेच्या लालसेपोटी अजित पवारांनी स्वतःच्या विचारधारेचा आणि धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाडून टाकला आहे.
अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी झाले आहे. मात्र तरीही शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सोडला नसल्याचे वारंवार सांगतात. मात्र, वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन त्यांनी भाजपासमोर लोटांगण घातले आहेत. हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खरे स्वरूप दाखवून देते, असे सपकाळ यांनी ठणकावून सांगितले.

भाजपचा कट
सपकाळ यांनी यासंदर्भात बोलताना अजित पवारांवर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवारांनी भाजपाच्या मदतीने आपल्या चुलत्या शरद पवार यांचाच पक्ष चोरला. पक्षाचे नाव आणि चिन्ह लाटले आणि आता सत्तेसाठी धर्मांधशक्तींशी हातमिळवणी केली. त्यांनी यापूर्वी एका इफ्तार पार्टीत मुस्लीम समाजाला पाठिंबा देण्याचे नाटक केले होते.
सपकाळ पुढे म्हणाले की, आता भाजपाच्या धोरणांना पाठिंबा देत त्यांचा विश्वासघात केला आहे. वक्फ सुधारणा विधेयक हे केवळ मुस्लीम समाजावर दबाव आणण्यासाठी आहे. त्यांच्या जमिनी हस्तगत करण्यासाठी भाजप सरकारचा कट असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. धारावीसारख्या महत्त्वाच्या जमिनी विशिष्ट उद्योगपतींना देण्याचा डाव सरकार आखत असल्याचेही सपकाळ म्हणाले.
Chandrapur : माजी नागरसेवकाने आयुक्तांच्या गाडीवर उधळले पैसे
खरे मुखवटे उघडे
सत्तेचा मोह अजित पवारांना इतका का आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, वक्फ जमिनी ताब्यात घेऊन त्या खासगी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा हा संपूर्ण डाव आहे. हे अजित पवारांना माहिती नाही असे नाही, मात्र, सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या विचारसरणीशी तडजोड केली आहे.
सत्तेसाठी लाचार झालेल्या अजित पवारांनी मुस्लीम समाजाला मोठा धोका दिला आहे. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा घणाघाती आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. त्यामुळे आता जनतेने सावध राहावे आणि खरी परिस्थिती ओळखून निर्णय घ्यावा, असा इशाराही त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील हे राजकीय रणकंदन आणखी किती तापणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.