
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिश्कील शैलीत फडणवीसांच्या स्वप्नप्रकल्पामागचा संघर्ष, विरोध आणि वेग यांची रंगतदार आठवण करून दिली.
राजकारणाच्या वेगवान महामार्गावर एक ऐतिहासिक टप्पा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’च्या अखेरच्या, इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मिश्कील आणि स्पष्टवक्तेपणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांनी या महामार्गाच्या प्रवासातील अनेक रंगतदार आठवणी सांगत विरोधकांपासून ते ड्रायव्हिंगपर्यंत सगळ्यांवर हलकाफुलका फटकारा मारला.
समारंभात बोलताना अजित पवार म्हणाले, समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ध्यास होता. सुरुवातीला या प्रकल्पाला जोरदार विरोध झाला होता. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठका होऊन हा प्रकल्प रोखण्याचे प्रयत्न सुरू होते. सगळे विरोधक एकत्र येऊन ‘हा प्रकल्प होऊ द्यायचा नाही’ असा ठरावही झाला होता. पण ज्या क्षणी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींचे दर जाहीर केले, त्या क्षणी सगळ्यांनी पाठ फिरवली. आम्हाला पाठिंबा देणारेच लोक आमच्याकडे न बघता थेट पैसे घेऊन जमिनी दिल्या. हा किस्सा सांगताना सभागृहात हास्यकल्लोळ उडाला आणि ‘राजकारणात स्थायित्व नाही’ याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहजपणे दाखवून दिले.

महाप्रकल्पाची महाकाय आकडेवारी
अजित पवार यांनी पुढे माहिती दिली की, 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गासाठी तब्बल आठ हजार 800 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. यावर नऊ हजार 903 लहान-मोठे पूल बांधण्यात आले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये महामार्गाचा काही भाग खुला झाला तेव्हा दिवसाला सुमारे दोन लाख वाहने प्रवास करत होती. पण आज मे 2025 मध्ये ही संख्या थेट 10 लाखांवर गेली आहे. हा महामार्ग केवळ लांबीने नव्हे तर खर्च आणि बांधकामाच्या दर्जानेही प्रचंड आहे . 12 कोटी सिमेंट पोत्यांचा वापर, सात लाख मेट्रिक टन स्टील, 14 घटमीटरचा भराव आणि आठ कोटी घनमीटर खोदकाम. यातील सहा कोटी घनमीटर सामग्री रस्त्याच्या कामात वापरली गेली आहे. या मार्गाने महाराष्ट्रातील 10 जिल्हे थेट आणि 14 अप्रत्यक्षपणे जोडले गेले आहेत. प्रारंभीचा खर्च 55 हजार 500 कोटी होता, पण वाढून तो आता 61 हजार कोटी रुपयांवर गेला आहे.
एकजुटीने केले कार्य
समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना झालेला एक अनुभव सांगताना अजित पवार म्हणाले, गाडीचं सारथ्य एकनाथ शिंदेंनी जबरदस्त केलं. फडणवीस गाडीत बसले, आणि ती थेट 100 ते 120 किमी प्रतितास वेगाने झपाझप धावत होती. पण जेव्हा बोगदा आला, तेव्हा त्यांनी अगदी नियमाप्रमाणे गाडीचा वेग शंभर किलोमीटर प्रतितासावर आणला. मी मागून सगळं लक्ष ठेवून होतो. त्यांच्या या विधानावर सभागृहात एकच हास्याचा झगा उडाला. त्यांनी पुढे मिश्कीलपणे सांगितले, “विमा उतरवलेला होता, पण त्याचा उपयोग करावा लागला नाही.
महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक सुविधांबाबत देखील सरकार जागरूक आहे. स्वच्छतागृहे, अल्पोहार केंद्रे, विश्रांती स्थळे यासाठी टेंडर काढण्यात आले आहेत. लवकरच या सुविधा कार्यान्वित होतील आणि प्रवास अधिक सुकर होईल, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले. समृद्धी महामार्गाचा प्रवास हा केवळ रस्त्यांचा नव्हे, तर महाराष्ट्राच्या आत्मविश्वासाचा प्रवास ठरतोय. सुरुवातीच्या प्रचंड विरोधातून पुढे जाऊन आज हा महामार्ग लाखो नागरिकांचा विश्वास संपादन करत आहे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या त्रयीने एकत्र येऊन महाराष्ट्राला वेगाची नवी ओळख दिली आहे.