
भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर जोरदार एअर स्ट्राईक करून शंभरहून अधिक अतिरेक्यांचा खात्मा केला. या कारवाईला अकोल्याचे भाजप नेत्यांनी मोदी सरकारच्या या निर्णायक पावलाचं स्वागत केलं.
दोन आठवड्यापूर्वी 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम या रम्य पर्यटनस्थळी घडलेला अमानुष दहशतवादी हल्ला देशाच्या हृदयावर घाव होता. या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. महिलांवर हल्ला करताना धर्म विचारून लोकांची हत्या करण्यात आली होती. देशभरातून संतापाची लाट उसळली आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात फक्त एकच भावना होती, बदला. या घटनेनंतर केवळ 15 दिवसांत, भारताने शांततेच्या मार्गावरून संयम राखत, पाकिस्तानातील दहशतवाद्यांना ठोस उत्तर देण्याचा निर्णय घेतला.
अखेर 6 मे रोजी मध्यरात्री 1 वाजून 28 मिनिटांनी, भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर लक्षवेधी एअर स्ट्राईक केला. या कारवाईत शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. अनेक इमारती व प्रशिक्षण केंद्रे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. राफेलच्या गडगडाटात दहशतवाद्यांच्या आश्रयस्थळांचा अंत झाला आहे. पहलगाम इथे झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात तणावाचे वातावरण होते. मात्र आता सरकारने ठोस पॉल उचलायला सुरुवात केली आहे.

विदर्भातून पाठिंबा
यासंदर्भात अकोला जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाकडून ऑनलाईन बैठक घेऊन मोदी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला. भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी भारताच्या या ऐतिहासिक पावलाचे स्वागत करत विदर्भवासीयांच्या वतीने पंतप्रधान आणि सैन्यदलाचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, मोदी सरकारने केवळ बदला घेतला नाही, तर 140 कोटी भारतीयांच्या मनातील भावना पूर्ण केल्या आहेत. पाकिस्तानात घुसून भारतीय सेनादलाचे जबरदस्त प्रत्युत्तर दिलं की, देशवासीयांच्या हृदयात भावना एका क्षणात व्यक्त झाल्या.
पहेलगाममध्ये धर्म विचारून 28 जणांची क्रूर हत्या करणाऱ्या अतिरेक्यांना दिलेली ही कारवाई म्हणजे केवळ सूड नव्हे, तर भारताच्या अस्मितेचं अचूक उत्तर होतं असंही ते म्हणाले. मोदी सरकारच्या दूरदृष्टीचा, सेनेच्या अचूक नियोजनाचा आणि देशवासीयांच्या अस्सल भावना यांचा हा परिपाक होता. खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितलं की, ही केवळ भारताची नव्हे, तर जगभरातील लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाची विजयगाथा आहे. ही केवळ एक कारवाई नव्हे, तर भारताच्या संरक्षणशक्तीची प्रचिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील शासनाची दृढ भूमिका यांचे मूर्त स्वरूप होते.
देश एकवटला पुन्हा
यशस्वी कारवाईमुळे पहलगाममधील शहीद नागरिकांचा बदला घेतला गेला आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून निर्णय घेतल्याने संपूर्ण देश एकवटला आहे. या बैठकीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, किशोर पाटील, जयंत मसने, विजय अग्रवाल, तसेच जिल्हा व तालुका पातळीवरील सर्व पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आणि विविध आघाड्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यासंदर्भात माधव मानकर व गिरीश जोशी यांनी सविस्तर माहिती दिली.