
अकोल्यात वारंवार होणाऱ्या वीज खंडित होण्याच्या समस्येवर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी निष्क्रीय असल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल कोणी एक चकारही शब्द काढला तर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी त्याच्या अंगावर अक्षरशः धावून जातात. त्याच्यामुळे अमोल मिटकरी दादांचे विश्वासू सैनिक आणि त्यांची मोठी ढाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असते. परंतु दादांची ही ढाल अकोल्याच्या वीज समस्येच्या प्रश्नावर मात्र कमकुवत ठरल्याचा संताप आता व्यक्त होत आहे. आमदार अमोल मिटकरी हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे. त्याच्याशिवाय शहरातील अनेक प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे.
विधानसभेपेक्षा वरिष्ठ असलेले विधान परिषद सभागृह त्याचे ते आमदार आहेत. त्याच्यामुळे त्यांचा मान आणि त्यांचा कार्यकाळ दोन्ही मोठा आहे. परंतु अमोल मिटकरी हे अकोला शहरांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे हे का पाहू शकले नाही, अशी खंत आता अकोल्यातील सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. अकोल्यातील वीज पुरवठ्याचा प्रश्नावर काँग्रेसचे नेते तथा अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी केवळ चम्पूगिरी केली असा आरोप भाजपकडून होतो. आंदोलन केल्यानंतर साजिद खान गायब झाले. अशा परिस्थितीमध्ये अकोल्याने कोणता लोकप्रतिनिधी कडे पहावं जो अकोलेकरांचा वीज पुरवठ्याचा प्रश्न सोडवू शकेल असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

अजितदादाचा कणखरपणा
अजितदादा हे मंत्रिमंडळातले सर्वात डॅशिंग नेते आहेत. दादा हे नुकतेच अकोल्यात येऊन गेले आणि दादांनी अनेक अधिकाऱ्यांना रस्त्याच्या मुद्द्यावरून झापले देखील. खराब रस्त्यावरून गाडी डिस्को डान्स केल्यासारखी येत होती. यापुढे जर असे रस्ते दिसले तर जो कोणी अधिकारी असेल आणि जरी तो कुठे बदलून गेला तर त्याला शोधून काढू आणि त्याला घरी पाठवू, त्याच्या नोकरीवर गदा येईल. मग असा कणखरपणा दादांची ढाल असलेले अमोल मिटकरी विजेच्या बाबतीत का दाखवू शकत नाही असा प्रश्न अकोल्यातून आता उपस्थित होत आहे. अकोल्यात वीजेच्या लपंडावाचा प्रश्न काही आजचा नाही.
गेली तीन-चार वर्षे नागरिकांवर हे अंधाराचे ढग घोंगावत आहेत. दिवसा विजेपासून वंचित आणि रात्री उष्णतेने होरपळणारे अकोलेकर आता चिडले आहेत. पण आश्चर्य म्हणजे, अकोल्याचेच आमदार असलेले अमोल मिटकरी हे या गंभीर प्रश्नावर अद्यापही झोपेत असल्यासारखे वाटत आहेत. वादग्रस्त विधानं करत सतत चर्चेत राहणाऱ्या मिटकरींचा आवाज अकोल्याच्या विजेच्या प्रश्नावर मात्र गायब आहे. आमचा आमदार फक्त टीव्हीवर दिसतो, पण आमच्या अंधारात नाही असा थेट सवाल नागरिक करू लागले आहेत. आता प्रश्न असा की, सतत प्रकाशझोतात राहणारे अमोल मिटकरी अकोल्याच्या अंधारात काही प्रकाश टाकणार की नाही? की वीज आली तरी आवाज न येणाऱ्या आमदारांचा विश्वास अकोलेकरांनीच घालवायचा? आगामी काळात मिटकरी या प्रश्नावर खरोखर काही ठोस पावलं उचलतात का, की निवडणूक जवळ आल्यावरच विद्युत झटका देतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.