
महायुती सरकारमध्ये निधीवरून सुरू असलेला वाद अद्यापही थांबलेला नाही. अकोला महापालिकेच्या दलित वस्ती सुधार योजनेसाठी निधी वाटपावर शिंदेसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महायुती सरकारच्या एकत्रित कारभाराच्या आड येणाऱ्या वाद-विवादांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी समाजकल्याण विभागाचा निधी वळवल्याचा मुद्दा चर्चेत आहे. शिंदे गटाचे नेते सिरसाट म्हणतात की, हा निधी त्यांच्या खात्यातून न विचारता वळवण्यात आला. यावरून महायुतीत अंतर्गत संवादाचा अभाव स्पष्ट दिसतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील कोल्ड वॉरची चर्चा राजकीय वर्तुळात नवीन नाही. मागील काही महिन्यांमध्ये फडणवीस यांनी शिंदे गटाच्या काही योजनांना ब्रेक लावल्याचाही आरोप होत आहेत.
शिंदे गटाच्या काही नेत्यांची सुरक्षा हटवण्यात आलेली होती. हे सुद्धा संबंधांतील तणावाचे लक्षण मानले जात आहे. या आरोपांमुळे आधीच महायुतीतील संबंधांमध्ये गडबड सुरू असतानाच, आता अकोल्यातूनही भाजपवर नवे आरोप शिंदे गटाने केले आहेत. अकोला महापालिकेच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या निधी वाटपावरून शिंदेसेना गटामध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. या मुद्द्यावरून शहरप्रमुख रमेश गायकवाड यांनी थेट पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे पत्रवजा निवेदन देत भाजपकडून सापत्न वागणूक दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

शिंदेसेनेची न्यायाची मागणी
महायुतीतील घटक पक्ष असूनही, निधी वाटपाच्या बाबतीत शिंदेसेनेच्या वाट्याला अन्याय येत असल्याचा मुद्दा गायकवाड यांनी ठामपणे उपस्थित केला आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आम्ही महायुतीच्या धोरणाशी प्रामाणिक राहून काम करत आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याचे फलित दिसून आले आहे. मात्र, आता आमच्या मतदारसंघातच अन्याय होत असल्याचे दु:खद आहे, असे ते म्हणाले. शहरप्रमुख गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितले की, महानगरपालिकेच्या अंतर्गत आमच्या बालेकिल्यात दलित वस्ती सुधार योजनेसाठीचा निधी थेट डावलण्यात आला आहे.
भाजपने पक्षहितासाठी हा निधी फक्त आपल्या गटासाठी राखून ठेवल्याचे दिसते. ते पुढे म्हणाले की, युतीधर्माचे पालन करताना आपल्या पक्षाचा विकास, कार्यकर्त्यांचे संरक्षण आणि पक्षसंवर्धन करणे हे देखील महत्त्वाचे आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी अपार मेहनतीने प्रचार केला. लोकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. आता त्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी निधीची गरज आहे, अशी गायकवाड यांची भूमिका आहे. रमेश गायकवाड यांनी या मुद्द्यावर केवळ दलित वस्ती सुधार योजनेपुरते मर्यादित न राहता, सर्वच योजनांमध्ये शिंदेसेनेला डावलले जात असल्याचा आरोप केला आहे.
Vijay Wadettiwar : उंची साडेचार फुटांची, गोष्ट करतात धर्म विचारून सामान घेण्याची
विकास कामांमध्ये अडथळे
निधी मिळत नसेल तर, विकास कामांमध्ये अडथळे येतात आणि सामान्य जनतेच्या अपेक्षांना तडा जातो, हे त्यांनी अधोरेखित केले. निधीचे समान वाटप व्हावे, हा आमचा नेहमीच आग्रह राहिला आहे. युतीमध्ये विश्वासाचे वातावरण हवे, अन्यथा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढेल आणि मतदारांमध्ये नाराजी निर्माण होईल, अशी गायकवाड यांची स्पष्ट भूमिका आहे. शहरप्रमुख गायकवाड यांनी पालकमंत्र्यांकडे विनंती केली आहे की, शिंदेसेनेला त्यांच्या बालेकिल्ल्यात हक्काचा निधी मिळावा यासाठी त्वरित हस्तक्षेप करावा. तुमच्याच मार्गदर्शनाखाली महायुतीचा यशस्वी प्रवास सुरू आहे. पण असा भेदभाव चालू राहिला, तर युतीच्या एकात्मतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे ते म्हणाले.
Maharashtra : शेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बनतील गार्डियन्स