अमरावतीचे जिल्ह्याचे भूषण गवई यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
न्यायाच्या सर्वोच्च आसनावर 14 मे रोजी महाराष्ट्राच्या अमरावतीचे सुपुत्र, भूषण रामकृष्ण गवई विराजमान झाले आहेत. भारताचे 52 सरन्यायाधीश म्हणून त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते घेतली. हा क्षण केवळ अमरावतीसाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाचा, गौरवाचा आणि प्रेरणादायी ठरला आहे. न्यायमूर्ती गवई यांच्या जीवनप्रवासाचा आलेख अतिशय प्रेरणादायी आहे. एका सामान्य मराठी कुटुंबातून आलेले भूषण गवई यांनी आपल्या कार्यातून न्यायव्यवस्थेत उच्च आदर्श निर्माण केले आहेत.
अमरावतीच्या मातीचा गंध घेत सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या गवई यांचं यश हे महाराष्ट्रातील युवकांसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरेल यात शंका नाही. संपूर्ण देश त्यांचं अभिनंदन करत आहे. अमरावती शहरातून निघून सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास त्यांनी आपल्या कर्तव्यपरायणतेने आणि निष्ठेने पार केला. अमर्याद कष्ट, न्यायव्यवस्थेतील नितिमत्ता, लोकशाहीप्रती निष्ठा आणि सहृदयता ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्यं ठरली आहेत. 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीत जन्मलेले भूषण गवई यांनी 1985 मध्ये वकिली सुरू केली.
Local Body Elections : विदर्भात भाजपच्या शिलेदारांची फौज सज्ज
नेत्यांकडून खास शुभेच्छा
गवई यांनी केवळ दोन वर्षांत, 1987 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू करत आपल्या व्यावसायिक प्रवासाची घोडदौड सुरु केली. त्या प्रवासातील हा टप्पा म्हणजे न्याय क्षेत्रातील एका यशोगाथेचा शिखरबिंदू आहे. 13 मे रोजी संजीव खन्ना यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती गवई यांनी देशाचे 52 सरन्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेतली. त्यांच्या कार्यकाळात सात महिने असले तरी, हा काळ भारतीय न्यायव्यवस्थेच्या दिशादर्शक निर्णयांनी परिपूर्ण असेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. अमरावतीचे पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. अमर्याद कष्ट, सहृदयता आणि लोकशाहीवरील निष्ठा म्हणजे भूषण गवई यांची कर्तव्यपरायणता, अशा शब्दांत त्यांनी अभिनंदन करत गौरव व्यक्त केला.
न्यायमूर्ती गवई हे केवळ सरन्यायाधीशच नव्हे, तर अनेक ऐतिहासिक निर्णयांत महत्त्वाची भूमिका बजावणारे न्यायाधीश ठरले आहेत. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय असो की 2016 मध्ये नोटाबंदीला कायदेशीर वैधता देणारा निर्णय या दोन्ही खंडपीठांचे ते महत्त्वाचे सदस्य होते.