
अमरावतीत सुरु होणाऱ्या मेगा टेक्स्टाईल पार्कमुळे उद्योगविश्वात उत्साहाची लाट उसळली आहे. या प्रकल्पामुळे अनेक रोजगार निर्माण होणार आहेत.
अमरावती जिल्ह्याच्या भविष्याला आता नवे पंख मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत अमरावतीसाठी आणलेल्या विकासाच्या योजनांची यथोचित माहिती दिली. विशेषत: पीएम मित्रा योजनेअंतर्गत सुरु होणाऱ्या मेगा टेक्स्टाईल पार्कचा उल्लेख करताना ते म्हणाले की, मोदींनी अमरावतीला टेक्स्टाईल पार्कसारखी मोठी भेट दिली आहे. देशातील सात टेक्स्टाईल पार्क पैकी एक अमरावतीला मिळणं ही गौरवाची गोष्ट आहे.

फडणवीसांनी यावेळी टेक्स्टाईल पार्कसाठी तयार होणाऱ्या पायाभूत सुविधांविषयी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. इतकेच नव्हे तर अमरावतीत पायलट ट्रेनिंग स्कूल देखील सुरू होणार आहे. ज्यामुळे अमरावतीचं नाव आता जागतिक पातळीवर पोहोचेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या टेक्स्टाईल पार्कचा केंद्रबिंदू म्हणजे कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशनपर्यंत साखळी निर्माण करणं आहे. फडणवीस म्हणाले की, हा प्रकल्प केवळ उद्योगांच्या दृष्टिकोनातूनच नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनातही आमूलाग्र बदल घडवेल.
विकसनाची नवी दिशा
अमरावती आणि आसपासच्या जिल्ह्यांतील कापूस उत्पादकांना थेट उद्योगांशी जोडण्याची संधी यातून निर्माण होणार आहे. या पार्कमुळे सुमारे दोन लाख रोजगार संधी उपलब्ध होणार आहे. संपूर्ण परिसरात औद्योगिक घडामोडींना गती मिळणार आहे. दहा हजार कोटींची भव्य गुंतवणूक यामध्ये अपेक्षित आहे. नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीजवळील पिंपळविहीर येथे एक हजार एकरावर हा प्रकल्प आकार घेत आहे. सदर प्रकल्पासाठी सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरचे नाव पुढे आले होते. मात्र स्थानिक काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर, केंद्र सरकारने अखेर अमरावतीला हा मान दिला.
दोन वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या या योजनेंतर्गत सात शहरांमध्ये मेगा टेक्स्टाईल पार्क उभारले जाणार आहेत. फडणवीसांनी अमरावतीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू केल्याचा आणि भविष्यात आयटी पार्क उभारण्याच्या योजना जाहीर केल्या. विमानसेवा सुरू झाल्यामुळे अमरावतीच्या विकासात आणखी एक पायरी गाठली गेली आहे. आपल्याला तीन हजार मीटर लांब धावपट्टी तयार करायची आहे. जेणेकरून कोणतेही विमान येथे उतरू शकेल, असे ते म्हणाले. एकेकाळी कृषिप्रधान जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावतीने आता आधुनिकतेच्या दिशेने झेप घेतली आहे.
विमानतळ, टेक्स्टाईल पार्क, वैद्यकीय आणि आयटी शिक्षण अशा सर्व बाजूंनी विकासाचा समतोल सांभाळत, अमरावती आता इंडस्ट्रियल हब होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.