
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र दौरा केला. दरम्यान शाह यांनी नांदेडमधील बैठकीत भाजप आमदारांना कानमंत्र दिला.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजकीय रणनितीचा पटच बदलून टाकला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बारकाईने आढावा घेत, त्यांनी मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भाजप स्वबळावर उतरू शकतो, असा संकेतच पक्षात दिल्याचं बोललं जात आहे. ही केवळ चाचपणी नाही, तर भविष्यातील मोठ्या राजकीय पावलांची चाहूलही असू शकते. अमित शाह यांनी नागपूरनंतर त्यांनी नांदेडचा दौरा केला. दरम्यान नांदेडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय रंगमंचावर एक नाट्यमय क्षण समोर आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समोरच भाजपच्या काही आमदारांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. अजित पवार आमच्या कुरघोड्या करतात, आमचं बळ कमी करत आहेत असा सूर आमदारांनी लावला होता. भाजप आमदारांनी थेट अमित शाह यांच्याकडे तक्रारीचा पाढा वाचला. त्यांचा आरोप होता की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार भाजपच्या पराभूत उमेदवारांना बाजूला ठेवून विरोधकांना बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः 2024 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये फूट पाडण्याचे काम अजित पवार करीत असल्याची भावना आमदारांमध्ये होती.

Akola : वर्दीतला विषारी धूर, अर्चित चांडक यांनी फुंकर घालून विझवला
संख्याबळ ही ताकद
अमित शाह यांनी मात्र या तक्रारींवर उलट भूमिका घेत सल्ला दिला. ‘अजित पवारांनी माझ्याकडे तक्रार घेऊन यायला हवं, तुम्ही नाही’ या एका वाक्यातच त्यांनी भाजप आमदारांना आक्रमक होण्याचा कानमंत्र दिला. अमित शाह म्हणाले, ‘तुमचं संख्याबळ अधिक आहे, त्यामुळे कुणाच्याही दबावाला घाबरू नका. प्रशासन आणि सरकार पातळीवर कामांचा आक्रमक पाठपुरावा करा.’ यावेळी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच हा सगळा संवाद रंगला. अमित शाह यांनी सर्व भाजप आमदारांना स्पष्टपणे सांगितले की, महायुती म्हणूनच पुढे जायचे आहे.
व्यक्ती केंद्रित राजकारणाऐवजी युतीची ताकद वाढवा.या बैठकीदरम्यान आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत आला. मुंबई, ठाणे आणि पुणे या महानगरांमध्ये भाजप स्वबळावर लढण्याच्या शक्यतेचा. अमित शाह यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा आढावा घेतला आहे. या निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरवण्यात येत आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा पुन्हा एकदा जोरात दिला जाण्याची शक्यता आहे. नांदेडमध्ये पार पडलेल्या भव्य जाहीर सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जोशात सुरुवात झाली. त्यांनी भारत माता की जयच्या जयघोषात आपलं भाषण आरंभले.
Devendra Fadnavis : सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांनी ओलांडली अज्ञानाची सीमा
संघर्ष नको युतीत
इतिहास आणि श्रद्धेने भरलेल्या नांदेडच्या मातीत उभं राहून शहा यांनी गुरु गोविंद सिंग, रेणुका देवी आणि ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांना कृतज्ञतेने नमन केलं. आपल्या भाषणात त्यांनी भावनिक सूर छेडत म्हटलं, ही भूमी प्रेरणेची आहे… इथून निघालेला आवाज थेट पाकिस्तानपर्यंत ऐकू जातो असं ते म्हणाले होते. अमित शाह यांचा स्पष्ट संदेश होता, तक्रारी न करता कामात आघाडी घ्या. भाजपला जर महाराष्ट्रात यश हवं असेल, तर युतीतील अंतर्गत संघर्ष टाळून, प्रभावी नेतृत्व, आक्रमक योजना आणि जमीनीवरचा पाठपुरावा यावर भर द्यावा लागेल.