
अमरावती विमानतळाचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला. या कार्यक्रमात काही घटनांमुळे वाद निर्माण झाला.
दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अमरावती विमानतळाचे भव्य उद्घाटन सोमवारी मोठ्या जल्लोषात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, तसेच केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती या सोहळ्याला लाभली. मात्र या सोहळ्याचे राजकीय सौजन्य व सन्मानशास्त्र पूर्णपणे हरवले होते, याचा प्रत्यय जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आणि उपस्थित नागरीकांना प्रकर्षाने आला.

खासदार बलवंत भाऊ वानखडे यांना या कार्यक्रमात मागच्या रांगेत बसवण्यात आले, तर याच जिल्ह्याचे माजी खासदार पुढच्या रांगेत मानाने विराजमान होते. या कृतीने संपूर्ण अमरावतीकरांना ठसठसत ठेवणारा अपमान जाणवला. काँग्रेसचे एकमेव लोकसभा खासदार असूनही, त्यांच्यावर करण्यात आलेले हे दुर्लक्ष केवळ प्रोटोकॉलचे उल्लंघन नव्हे, तर राजकीय द्वेषाचे स्पष्ट लक्षण ठरले.
भाषणही दुर्लक्षपूर्ण
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात उपस्थित लोकप्रतिनिधींचे नामोल्लेख करताना बलवंत वानखडे यांचे नाव टाळले. ही कृती भाजप-शिंदे सरकारच्या विरोधकांबाबतच्या मानसिकतेचे प्रातिनिधिक उदाहरण बनली आहे. वानखडे यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींना पाठीमागे ठेवणे आणि भाषणातूनही नोंद न घेणे, हे राजकीय सूडभावनेचेच प्रतिक ठरले.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाच्या बाहेर पोलिसांशी बाचाबाची केली, ही आणखी एक महत्त्वाची बाब ठरली. नियोजनातील त्रुटी आणि राजकीय आक्रमकतेने कार्यक्रमाचा गालबोट लागलेला झाला. कार्यक्रमाचे स्वरूप जरी भव्य असले, तरी त्यातील सौजन्य, समन्वय आणि सन्मान यांचा पूर्णतः अभाव दिसून आला.
अपमानाची प्रतिक्रिया प्रखर
संपूर्ण अमरावती जिल्ह्यात या प्रकारामुळे संतापाची लाट उसळलेली आहे. ज्यांनी अमरावतीच्या विकासासाठी दिल्लीमध्ये सतत पाठपुरावा केला, त्या खासदाराचा सार्वजनिक कार्यक्रमात अपमान केला गेला, ही बाब नागरिकांना व्यथित करणारी ठरली आहे. कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांनी राजकीय शिष्टाचार पाळले असते, तर अमरावतीकरांना अभिमान वाटला असता.
लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना या घटनेने धक्काच दिला आहे. एखादा लोकप्रतिनिधी फक्त विरोधी पक्षात असल्याने त्याच्यावर असा वागणूक दिली जाणे, ही दुर्दैवी बाब आहे. अमरावतीच्या विकासासाठी संघर्ष करणाऱ्या बलवंत वानखडे यांचा झालेला अपमान, हा केवळ एका व्यक्तीचा नाही, तर अमरावतीच्या आत्मसन्मानाचा घात आहे.