प्रशासन

Amravati: वीज नाही म्हणून महावितरण कार्यालयातच लावली आग

MSEDCL : थरारक क्षणात अभियंत्याची धडपड

Author

अमरावती जिल्ह्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या दोन तरुणांनी महावितरणच्या कार्यालयात घुसून आगजनी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अवकाळी पावसाने हैराण झालेल्या विदर्भातील नागरिकांना आता वीज खंडित होण्याचा दुहेरी फटका बसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सामान्य जनतेचा संयम सुटू लागला आहे. अशाच एका संतप्त प्रतिक्रियेत अमरावती जिल्ह्यातील दोन युवकांनी थेट वीज उपकेंद्रात घुसून आगजनी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (१५ जून रोजी) दुपारी अमरावतीतील खारतळेगाव येथील महावितरणच्या वितरण केंद्रात ही थरारक घटना घडली. वीज गायब झाली म्हणून थेट उपकेंद्रात येऊन संतप्त तरुणांनी ऑफिसातील टेबल, खुर्च्या आणि शासकीय कागदपत्रांनाच पेटवून दिलं. विशेष म्हणजे या घटनेत कनिष्ठ अभियंता गोपाल इंगळे यांचा जीव थोडक्यात बचावला.

गोपाल इंगळे हे नेहमीच्या कामावर होते. त्यांच्यासोबत वरिष्ठ तंत्रज्ञ अजय धाकडे, यंत्र चालक गोपाल नेरकर आणि सुरक्षा रक्षक मिलिंद पानबुडे हे देखील उपस्थित होते. दरम्यान, रेवसा गावातील काही नागरिकांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिलं होतं. तेवढ्यात वलगाव येथील अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे हे दोघं उपकेंद्रात आले. चार प्लास्टिकच्या बाटल्या हातात घेऊन त्यांनी थेट धमकी दिली, तुमचं ऑफिस जळवून टाकतो, तुम्हालासुद्धा पेटवून देऊ. इंगळे आणि सहकाऱ्यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या दोघांनी पेट्रोल शिंपडून टेबल, खुर्च्यांना आणि कागदपत्रांना आग लावली.

Bacchu Kadu : सप्टेंबरपूर्वी मला जेलमध्ये टाकण्याचा कट रचला जातोय

आत्मदहनाचा देखील प्रयत्न

सर्व गोंधळात इंगळे यांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र विनीत तायडे याने मोबाईल हिसकावून घेतला आणि तात्काळ आग लावली. दुसरीकडे, अविनाश निर्मळ याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रकार घडवला. सुदैवाने इंगळे यांनी प्रसंगावधान राखत मोबाईल परत हिसकावून घेतला आणि भीतीपोटी बाहेर पळाले. त्यांनी लगेच कार्यकारी अभियंता लांडे यांना घटनेची माहिती दिली. या सर्व गोंधळानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून दुचाकीवरून फरार झाले. घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जर आम्ही वेळेत पळाले नसतो, तर त्या दोघांनी पेट्रोल ओतून आणि आगपेटी लावून आमच्यावरच प्रचंड जोखमीची ज्वाला फोडली असती, असे प्रभारी सहायक अभियंता गोपाल इंगळे यांनी सांगितले. सकाळी काही नागरिकांचे निवेदन घेतल्यानंतर अचानक आलेले अनपेक्षित हल्लेखोर आम्हाला व्हिडीओ शूट करताना पेट्रोल ओतून आणि आगपेटीने धास्तावले, तेव्हा आम्ही भीतीपोटी बाहेर पळालो. या घटनेनंतर कनिष्ठ अभियंता इंगळे यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी आरोपी अविनाश निर्मळ आणि विनीत तायडे यांच्यावर हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, शासकीय संपत्तीचे नुकसान अशा गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.

Akola BJP : आमदार पठाण फक्त चमकतात, पण वीज आणत नाहीत 

आरोपींचा शोध सुरू

उपकेंद्रातील टेबल, खुर्च्या आणि दस्तावेज जळून खाक झाले असून कार्यालयाच्या खिडक्यांचीही तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. वीज वितरण व्यवस्थेवर तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांसह कर्मचाऱ्यांकडूनही होऊ लागली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू केली आहे. ही घटना केवळ संतापाचा क्षण नव्हे, तर ग्रामीण भागातील वाढती अस्वस्थता दर्शवणारा गंभीर इशारा आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास लोकशाही मार्ग सोडून टोकाची भूमिका घेणं हा धोक्याचा ट्रेंड ठरू शकतो. शासनाने आणि वीज वितरण कंपन्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!