
अमरावतीतील 118 पाकिस्तानी हिंदू नागरिकांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बदललेल्या निर्णयामुळे त्यांचे भारतातील वास्तव्य आता सुरक्षित झाले आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरातील पाकिस्तानी नागरिकांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तातडीने रद्द करण्यात आले आहे. त्यांना 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र केंद्र सरकारने आपल्या निर्णयात महत्त्वपूर्ण बदल करत अमरावतीतील 118 पाकिस्तानी हिंदू नागरिकांना दिलासा दिला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे अमरावतीत स्थायिक झालेल्या नागरिकांचे भारतातील वास्तव्य अधिकृतरित्या सुरक्षित झाले आहे. अमरावतीत मागील अनेक वर्षांपासून स्थायिक असलेल्या या नागरिकांना भारतात राहण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण उमटले आहेत. केंद्र सरकारने वेळेवर घेतलेल्या या सकारात्मक निर्णयामुळे अमरावतीत नव्या आशेची पालवी फुटली आहे.

दीर्घकालीन स्थायिक
सध्या अमरावती शहरात एकूण 118 पाकिस्तानी हिंदू नागरिक वास्तव्य करत आहेत. हे सर्व नागरिक दीर्घकालीन अनुबंधावर भारतात आले होते आणि मागील 10 ते 15 वर्षांपासून येथे आपले संसार थाटले आहेत. यातील अनेकांनी स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. तसेच शहराच्या आर्थिक चक्रात आपला वाटा उचलला आहे.
भारतीय नागरिकत्वासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे अधिकृतपणे अर्ज सादर केला होता. त्यांच्या अर्जांची शासकीय स्तरावर तपासणी सुरु आहे. आवश्यक त्या प्रक्रियेनंतर त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात येत आहे. या नागरिकांच्या भारतीय समाजात एकरूप झाल्याचे चित्र सध्या अमरावतीत दिसून येते. अनेकांनी आपली मुले स्थानिक शाळांमध्ये प्रवेशित केली आहेत. सामाजिक व आर्थिक पातळीवरही सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
Chandrashekhar Bawankule : राहुल गांधींनी महाराष्ट्राची माफी मागावी
केंद्र सरकारचा निर्णय
मागील महिन्यात पाकिस्तानी नागरिकांचा एक गट धार्मिक कार्यक्रमासाठी अमरावतीत दाखल झाला होता. पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी सांगितले की, धार्मिक विधी आटोपून संबंधित गट परत गेला आहे. केंद्र सरकारने 2019 ते 2024 या कालावधीत पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला होता. ज्याचा परिणाम म्हणून अमरावतीतील नागरिकांनाही आता अधिकृत संरक्षण मिळाले आहे.
निर्णयामुळे अमरावतीत स्थायिक हिंदू पाकिस्तानी नागरिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यांच्या भविष्याला आता नवा आधार मिळाला आहे. केंद्र सरकारने या नागरिकांना दीर्घकालीन परवानगी अर्थात लाँग टर्म व्हिसा प्रदान केला आहे. त्यामुळे त्यांच्या भारतातील वास्तव्यास अधिकृत मान्यता मिळाली आहे. यामुळे ते आपले जीवन अधिक स्थिरतेने आणि निर्भयतेने पुढे नेऊ शकणार आहेत.
देशभरात कठोर उपाययोजना
काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून आक्रमक भूमिका घेतली. देशभरातील सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सर्व राज्य सरकारांना पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्याचे कठोर निर्देश देण्यात आले आहेत.
अमरावतीतील दीर्घकालीन वास्तव्यास असलेल्या हिंदू नागरिकांना या निर्णयात दिलासा देण्यात आला आहे. ज्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाला मानवीय बाजू प्राप्त झाली आहे. त्यामुळे अमरावती शहरात सध्या समाधानाचे वातावरण आहे आणि स्थिरतेच्या दिशेने पावले टाकली जात आहेत.